भावना गवळी यांच्या नाराजीचा फटका महायुतीच्या उमेदवाराला, मिंधे गटाची डोकेदुखी वाढली

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भावना गवळी यांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने तिकीट नाकारण्यात आले. यामुळे भावना गवळी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच नाराजीचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मिंधे गटातील सुंदोपसुंदी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. उलटपक्षी पक्षांतर्गत कलह हा दिवसागणिक वाढत असून तो आता चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक बोलावली आहे. मात्र, या आढावा बैठकीला भावना गवळी गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या जर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर राहिल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भावना गवळी यांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यातच भावना गवळी यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत. यासाठी मुख्यमंत्री यांचा निरोप घेऊन मंत्री उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी भावना गवळी यांच्या रिसोड येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. मात्र, असे असताना देखील भावना गवळी यांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील राजकारण कलाटणी घेते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भावना गवळी या माझ्या बहिणीसारख्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यामुळे लोकसभा उमेदवारी नाकारतानाच त्यांचे लवकरच पुनर्वसन करू, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आश्वासनानंतर देखील भावना गवळी यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यांची आढावा बैठकीत अनुपस्थितीत हे भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरुद्ध सरळ सरळ उघड बंड केले आहे असे मानले जाऊ शकते.

उलटपक्षी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार संजय देशमुख यांनी प्रचारात सुरवातीपासूनच आघाडी घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे येऊन आधीपासूनच संपूर्ण नियोजन करीत सामूहिकरीत्या प्रचाराचा धडाका लावला आहे. यामुळे विरोधकांच्या मनात आधीपासूनच धडकी भरली आहे . त्यातच भावना गवळी यांचे बंड हे महाविकास आघाडीच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. भावना गवळी काही वेगळा निर्णय घेतात का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय अनेक चर्चाना देखील पेव फुटले आहे.