सर्व संमतीने राज्यघटनेत बदल हवा! भाजप उमेदवार अरुण गोविल यांचे वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणूक होण्याआधीच भाजप नेते आणि उमेदवार राज्यघटना बदलण्या मागे लागले आहेत. भाजपचेलल्लू सिंह, ज्योती मिर्धा, अनंत हेगडे यांच्यानंतर आता रामायण मालिकेतलेप्रभू श्रीराम आणि मेरठचे उमेदवार अरुण गोविल यांनीही सर्व संमतीने राज्यघटनेत बदल करण्यात काही हरकत नाही, असे वादग्रस्त विधान केले आहे.

मेरठध्ये प्रचारादरम्यान गोविल यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात राज्यघटनेतील बदलाला गोविल यांनी पाठिंबा दिला आहे. गोविल म्हणाले, आपल्या देशाच्या राज्यघटनेची निर्मिती झाल्यानंतर, परिस्थिती आणि काळानुसार, त्यात हळूहळू बदल झाले आहेत. ‘बदल करणे हे प्रगतीचे लक्षण आहे. यात काहीच चूक नाही. कारण तेव्हा काही वेगळी परिस्थिती होती आणि आज काही वेगळी आहे. त्यानुसार आपल्याला काही बदल करायचा असेल… आणि राज्यघटना कुण्या एका व्यक्तीच्या मनाने बदलता येत नाही.’

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गोविल यांचा व्हिडिओ शेअर करत देशातील 85 टक्के दलित, मागास, वंचित आणि शोषित लोकहो, सावधान. भाजप संविधान बदलणार हे स्पष्ट आहे. आरक्षण संपेल. अरुण गोविल हे तर थेट मोदीजींचेच उमेदवार आहेत’, अशी टीका केली आहे.

संविधान बदलणाऱयांचे जनता डोळे काढेल

भारतीय जनता पार्टीचे नेते निवडणुकांना प्रचंड घाबरले आहेत. त्यांनी आतापासूनच पराभव मान्य केला असून जनतेचे मनोबल ढासळवण्यासाठीच 400 पारचा नारा देत आहेत. अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर घणाघात केला. ते सातत्याने संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. परंतु, तसा प्रयत्न जरी कुणी केला तर या देशातील गरीब, दलित आणि मागासवर्गीय त्यांचे डोळे काढतील असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला.