माझ्या लक्षवेधी लागत नाहीत, हक्क डावलण्यात येतोय; भास्कर जाधव यांनी व्यक्त केला संताप

नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आपल्या लक्षवेधी लागत नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केली आहे. या अधिवेशनातही माझी लक्षवेधी लागली नाही. हे सतत माझ्याबरोबर घडत आहे. माझा हक्क डावलण्यात येत आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

मला सभागृहात बोलायला दिले पण माझी लक्षवेधी लागली नाही. मी आपले अभिनंदन एवढ्यासाठी करतो की, याही अधिवेशनात 7 डिसेंबरला माझी लक्षवेधी लागली होती. काही कारणास्तव ती पुढे गेली. लक्षवेधी पुढे गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती लागते. मात्र, याही वेळेला माझी लक्षवेधी लागली नाही. हे सातत्याने माझ्याबाबत घडत आहे. माझा हक्क डावलण्यात येत आहे, असे जाधव म्हणाले. चार-पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात. पण, सभागृहात घडलेल्या घटनांबाबत लक्षवेधी लागत नाही. हा अध्यक्षांकडून माझ्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. तो अन्याय होऊ नये म्हणून मी विनंती केली. मात्र, अभिनंदन करून मला आपला आणि खुर्चीचा अपमान करायचा नाही, असेही भास्कर जाधव म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, भास्कर जाधव यांच्या लक्षवेधी पुढे ढकलण्याचे कारण तपासले जाईल. सभागृहात सदस्य उपस्थित नसल्यावर ती लक्षवेधी आपण स्थगित करतो अथवा सदस्यांच्या विनंतीनंतर पुढे ढकलतो. मंत्री उपस्थित नसल्याने किंवा उत्तर आले नसल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली असेल, तर ती बुधवारच्या कामकाजात घेण्यात येईल. सभागृहात काम करताना कुठलाही अध्यक्ष सदस्यांना लक्ष्य करून बोलण्याची संधी नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण गैरसमज काढून टाकावा, अशी विनंती राहुल नार्वेकरांनी भास्कर जाधवांना केली.