राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विजय वड्डेटीवार यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली. संसदेत खासदारांचे निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज,ओबीसी समाज यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या सर्व योजना फसव्या आहेत. हिवाळी अधिवेशनाकडे राज्यातील शेतकरी, सर्व सामन्याचे डोळे लागले होते. मात्र, या सरकारने सामान्य जनतेची , शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे, असा हल्लाबोल वड्डेटीवार यांनी केला. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सर्व विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

विधिमंडळ परिसरात विरोधक विविध प्रश्नावर आक्रमक झाले होते. त्यांनी परिसरात मोर्चा काढत कापूस सोयाबीनला भाव दिला का ? नाही, नाही, नाही. भाताला भाव मिळाला का?नाही, नाही, नाही, धानाला भाव मिळाला का ? नाही, नाही, नाही असे म्हणत सगळ्या घटकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केले.हाताला काळी फीत बांधून, हातात घोषणांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.