आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलं नाही! मिंधे गटाची केविलवाणी अवस्था, नेत्यांनीच स्वमुखानं सांगितली कहाणी

bharat-gogawale

स्वाभिमानाची भाषा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून पक्ष पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिंधे गटाची अवस्था ‘केविलवाणी’ झाली आहे. राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना विरोध असल्याचा गाजावाजा करत मंत्रिपदाची पदाची मोठी स्वप्न पाहात भाजपसोबत गेलेल्या मिंधे गटाची आता चांगलीच अडचण झाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची स्वप्न पाहणाऱ्या मिंधे गटाच्या नेत्यांना अजित पवारांच्या भाजपसोबत येण्यानं ‘तेलंही गेलं, तूपही गेलं…’ अशीच अवस्था झाली असून आता आपल्या गटाची अवस्था त्यांनी सर्वांसमक्ष सांगितलं आहे. आता ‘कुर्बानीसाठीही काही शिल्लक राहिलेलं नाही’, अशा शब्दात भरत गोगावले यांनी मिंधे गटातील नेत्यांची परिस्थिती मांडली आहे.

पत्रकार परिषदेत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मिंधे गटाची सत्य परिस्थिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवारांसाठी तुम्ही कुर्बानी देण्यासाठी तुम्ही तयार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ‘आता जेवढं दिलं तेवढं बरच मोठं दिलं आहे. आता कुर्बानीसाठीही काही शिल्लक उरलेलं नाही’, असं ते म्हणाले. त्यामुळे आमच्या गटाचं म्हणणं आहे की आता पालकमंत्रिपद आपल्याला हवं’ असंही त्यांनी सांगितलं.

मंत्रिपदासाठी आम्ही समजून घेतलं मात्र पालमंत्रीपदासाठी समजून घेण्याचा काही प्रश्नच आणि आम्ही समजून घेणार नाही, असं स्पष्ट केलं.

आम्ही दोघेही शर्यतीत!

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यासंदर्भात घोषणा न झाल्यास आम्ही काय भूमिका घ्यायची ते आज संध्याकाळी ठरवू. आम्ही दोघेही शर्यतीत असल्याचं भरत गोगावले यांनी बोलून दाखवलं आहे.

‘मला वाटतं मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त काळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्व ‘जे काही वरिष्ठ नेते’ आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. एक दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतं, असा आशावाद मिंधे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला. खरंच उत्तर पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारू शकतात असं म्हणत त्यांनी सारं ओझं मुख्यमंत्र्यांवर टाकत हात वर केले.

‘आम्हाला नोटीस वैगरे काही नाही, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील संबंध नाही. कुणीतरी वावड्या उठवतं आणि त्यामुळे तुम्ही असं विचारतात’, असं म्हणत संजय शिरसाट यांनी टोलवा टोलविची उत्तरं दिली. तसंच ‘अर्थमंत्री पद अजित पवारांना मिळणार अशा सगळ्या बातम्या तुमच्या मीडियाकडून येतात. कुणी सांगितलं? मुख्यमंत्री, उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित दादांनी सांगितलं का? तुम्ही लोक खाते वाटप करून टाकतात आणि आम्हाला अडचणीत आलतात. खातेवाटपासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही’, असंही शिरसाट यांनी वैतागून म्हणाले. तसेच ‘तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. कोणतं खातं कोणाकडे जाईल तेव्हा आपण चर्चा करू’, असंही ते म्हणाले.

पालकमंत्रीपद मिंधे गटालाच हवं!

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून प्रश्न विचारला असताना वस्तुस्थिती तिच आहे, त्याबद्दल दूमत असण्याचं कारण नाही. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे रहावं ही कायमच मागणी आहे. उदय सामंतांकडे ते होतं आता आमचा नंबर लागला तर ते आमच्याकडे येईल असा बाण गोगावलेंली सोडला. पालकमंत्रीपदासाठी तटकरेंना आमचा विरोध राहिल, हे आम्ही सांगतो, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. यामुळे तिन्ही पक्षांत दिसणारी शांतता ही वरवरची असल्याचं पुन्हा दिसून आलं आहे.