धारावीकरांच्या हक्कासाठी 16 डिसेंबरला शिवसेनेची ‘अदानी’वर धडक

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्पेशल प्रोजेक्ट जाहीर करूनही धारावीकरांना फक्त 300 फुटांची जागा देण्याचा घाट सरकारने घातला असून, विकासक अदानीवर मात्र सवलतींचा वर्षाव केला आहे. कोणत्याही हरकती-सूचना न मागवता सरकारने थेट विकासाची हमी घेतली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणचा ‘टीडीआर’ मुंबईत कुठेही वापरण्याची मुभा अदानीला दिल्यामुळे इतर विकासकांना पहिल्यांदा टीडीआर वापरायचा असेल तर तो अदानीकडून घ्यावा लागणार आहे. हा प्रकार म्हणजे ‘सब मुंबई अदानी’ की, असा आहे. यातच सर्व्हे रखडला असून पुनर्विकासाबाबत धारावीकरांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कॉण्ट्रक्टरांचे सरकार आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबर रोजी धारावीतून अदानीच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

इतर ठिकाणच्या पुनर्विकासात किमान 400 फुटांचे घर मिळते, मग धारावीकरांनाच 300 फुटांचे घर देऊन अन्याय का करता, असा सवालही त्यांनी केला. या ठिकाणी पिढय़ान्पिढय़ा राहणाऱया धारावीकरांना त्यांच्या लघु-सूक्ष्म उद्योगासह जागा मिळायलाच हवी, अशी जोरदार मागणीही त्यांनी यावेळी केली. ‘धारावी बचाव’ या मोहिमेखाली धारावीकरांच्या हक्कासाठी शिवसेना लढत राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या ठिकाणी निर्माण होणाऱया प्रकल्पात प्रथम धारावीकरांना जागा दिल्यानंतर गिरणी कामगार, पोलीस, सरकारी कर्मचारी, सफाई कामगारांनाही घरे द्यावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मोर्चा निघणार असून अदानीच्या कार्यालयावर धडकणार आहे.

90 हजार झोपडीधारक अजूनही संभ्रमात

धारावी पुनर्विकास प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतलेले नाही. या प्रकल्पात आपल्याला किती जागा मिळणार, कोणत्या सुविधा मिळणार याबाबत धारावीकरांना कोणतीही माहिती सरकार पिंवा विकासकाकडून देण्यात येत नाही. धारावी झोपडपट्टी असली तरी या ठिकाणच्या जागेला सध्या सोन्याचा भाव आहे. त्यामुळेच या जागेवर विकासकांच्या नजरा आहेत, असेही ते म्हणाले. या ठिकाणच्या केवळ 58 हजार झोपडय़ांचे सर्वेक्षण आतापर्यंत झाले आहे. 80 ते 90 हजार झोपडीधारक अजूनही पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. या सगळय़ा झोपडीधारकांना विकासक अदानी धारावीतून बाहेर काढणार का, असा सवालही त्यांनी यावेळी दिला.

बीडीडीच्या धर्तीवर पुनर्विकास करा!

विकासकाला दिलेल्या विशेष सवलतीमुळे आणि 40 टक्क्यांच्या अटीमुळे इतर विकासकांचा टीडीआर कोल्ड स्टोरेजमध्ये जाणार असून टीडीआरचा दर काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी राहणार आहे. यात विकासकाचा फायदा होणार आहे. त्यामुळे विकासकाचे भले करण्यापेक्षा टीडीआर पंपनी स्थापन करून अधिकार स्वतःकडे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. बीडीडी चाळींचा विकास जसा म्हाडाच्या माध्यमातून होत आहे त्याच धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा, टीडीआर बँकेचा ताबा सरकारने स्वतःकडे ठेवावा आणि टीडीआर सरकारने विकत घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

…तर शिवसेना सर्व्हे उधळून लावेल!

टीडीआरचा दुरुपयोग केल्याने एअरपोर्ट अॅथॉरिटीचा विकासक सध्या तुंरुगात आहे. त्यामुळे अदानीसाठी धारावी आंदण देणारे सरकार धारावीमध्येही टीडीआरचा दुरुपयोग झाल्यास अदानीला तुरुंगात टाकण्याची हिंमत दाखवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धारावीचा सर्व्हे करताना पैशाच्या जोरावर दडपशाही केली, दमदाटी केली तर शिवसेना हा सर्व्हे उधळून लावेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेची ताकद दिसण्यासाठी सत्तेची गरज नाही. शिवसेनेची ताकद रस्त्यावर उतरण्यात आहे, असेही त्यांनी ठणकावले.

मिंध्यांनी ‘मुंबाआईला’ खतम करण्याचे पाप करू नये!

मुंबई ही मराठी माणसाने 1960 मध्ये रक्त सांडून, बलिदान देऊन मिळवली आहे. त्यामुळे ही मुंबई आम्ही कुणाच्या घशात घालू देणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. यासाठी 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता निघणाऱया मोर्चात शिवसैनिकांसह सर्व मुंबईप्रेमींनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. धारावीकरांनी आपल्या जागा विकासकाला बळकावू देऊ नयेत. कोणतीही अडचण असली तर शिवसेनेकडे यावे. शिवसेनेचे मर्द तुमची मदत करतील, असे आश्वासनही देतानाच खुर्चीसाठी मिंध्यांनी मुंबाआईला खतम करण्याचे पाप करू नये, असा इशारा देतानाच मुंबईकडे वाकडय़ा नजरेने पहाल तर याद राखा, असेही ते म्हणाले. या मोर्चात मुंबईच्या विविध भागांत सध्या अमाप येणाऱया वीज बिलामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे या वाढीव बिलाचा जाबही यावेळी विचारला जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

आणखी तीन प्रकल्प अदानीच्या घशात

मुंबईत सध्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रचंड प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी यंत्रे घेणे सुरू आहे. या यंत्रांसाठी पुन्हा काँट्रक्टर नेमले जात आहेत. त्यातून पुन्हा काँट्रक्टरचा फायदा. हे सरकारच काँट्रक्टरचे आहे. मुंबईत प्रस्तावित असणारे अभ्युदयनगर, आदर्शनगर आणि वांद्रे रेक्लमेशन क्लस्टर प्रोजेक्ट हे मोठे प्रकल्पही अदानीच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू असल्याचा गौप्यस्पह्टही त्यांनी यावेळी केला. केवळ अदानीचे भले करण्याचा विचार शिवसेनेला मंजूर नसल्याचेही त्यांनी ठणकावले.