नुकसानभरपाई मिळण्यासाठी रचला अपघाताचा बनाव, नगरमधील पाचजणांवर गुन्हा दाखल

अपघाताची नुकसानभरपाई मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची व टाटा एआयजी इन्शुरन्स विमा कंपनीची फसवणूक केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून समोर आले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सीआयडीच्या कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी नगर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दावेदार आबासाहेब चिमाजी वडीकते (वय 40, रा. कडीत बुद्रूक, ता. श्रीरामपूर), तपासी अंमलदार देवीदास काशिनाथ भडकवाड (वय 48, रा. पोलीस मुख्यालय, नगर), वाहनचालक अल्ताफ सलीम शेख (वय 36, रा. सुभाष कॉलनी, नेवासा रस्ता, श्रीरामपूर), वाहनमालक यासीन सरदार शेख (वय 47, रा. सिद्धार्थनगर, कॉलेज रस्ता, श्रीरामपूर), प्रत्यक्ष वाहन ताब्यात असलेला व्यक्ती राजमहंमद सरदार शेख (वय 54, रा. सक्रापूर, लांडेवाडी, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीने संशय व्यक्त केलेल्या मोटार अपघात दाव्याची चौकशी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. आबासाहेब वडीकते याने दाखल केलेल्या मोटार अपघात दाव्याची फिर्याद पोलीस निरीक्षक पाटील यांनी चौकशी केली. वडीकते याने 5 जून 2016 रोजी अपघात झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या दुचाकीला 21 एप्रिल 2016 रोजी टेम्पोने (एमएच 17 बीडी 3639) धडक दिल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते. याबाबत निरीक्षक पाटील यांनी दावेदार, वाहनमालक व चालक, इतर साक्षीदार व तपासी अंमलदार यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जवाब नोंदविले.

सदर मोटार अपघात दावा चौकशीमधील साक्षीदार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर, पिपाडा मोटर्स यांनी दिलेला अहवाल, उपलब्ध दस्तऐवज, सिटी केअर हॉस्पिटलमधील मूळ एमएलसी, तोफखाना पोलीस ठाण्यातील दाखल गुह्याची कागदपत्रे याची पडताळणी करण्यात आली.

संशयित आरोपींनी आपापसात संगनमत करून कटकारस्थान रचून विमा कंपनीकडून अपघाताचा आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार केला. न्यायालयात खोटे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालय, नगर येथे अपघात दावा नुकसानभरपाई रक्कम मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची व टाटा एआयजी विमा कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.