हे खासदारांचं निलंबन नव्हे, तर संसदेतून थेट लोकशाहीचं निलंबन; जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया

संसदेत 13 डिसेंबर रोजी झालेल्या घुसखोरीवर विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, ही मागणी केल्याने एकूण 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यसभा आणि लोकसभेतील 141 खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांचं एवढ्या मोठ्या संख्येने निलंबन केल्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 141 खासदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. हे खासदारांचं निलंबन नव्हे तर संसदेतून थेट लोकशाहीचं निलंबन आहे, असे आव्हाड म्हणाले.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, देशाच्या संसदेत भाजपने वर्षानुवर्षे विरोधी पक्षाची भूमिका निभावलेली आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी ती भूमिका कायम ऐकून घेतली. पण सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर भाजपने हुकूमशाही सुरु केलीये. काल आणि आज मिळून एकूण 141 विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. मुळात लोकशाहीत संवाद महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच विरोधी पक्षदेखील प्रश्न विचारण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. पंतप्रधान देशाच्या संसदेत लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधायला तयार नाहीत आणि गोंधळासारख्या क्षुल्लक कारणावरून खासदारांचे निलंबन केले जातंय. लोकशाहीप्रधान भारतातील संसदेच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे, असेही आव्हाड म्हणाले.