लेख- स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा जागर!

>> मीनल सतीश सरकाळे

यंदा जागतिक महिला दिन 2024 साठी Inspire Inclusion अर्थात महिलांच्या समावेशास प्रेरणा देणे ही संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. म्हणजेच महिलांसाठी समाजाच्या सर्व पैलूंमध्ये विविधता आणि सक्षमीकरणाच्या महत्त्वावर भर देणे. महिला दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरुकता आणणे तसेच रूढीवादी पद्धतींना आव्हान देणे, महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे. यासाठी एवढेच म्हणावे लागेल की, सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर!

समाजात पसरलेल्या विघातक दुष्कृत्यांचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो फक्त महिलांना. सर्व देशांतील महिलांची स्थिती विचारात घेण्यासारखी आहे. एकविसाव्या शतकातही महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. अनेक शतकांपासून महिलांनी आपल्या हक्कांसाठी अनेक प्रयत्न केले आहेत आणि आजही त्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. इतक्या वर्षांत आपण किती वेळा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला हे माहीत नाही, परंतु सत्य हे आहे की, विशेषतः महिलांच्या सुरक्षेमध्ये आणि अधिकारांमध्ये काहीही बदल झालेला नाही. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱया अशा अनेक प्रथा भारतात पसरल्या आहेत. स्त्रियांना योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचे प्रत्येक धर्मात दिसून आले आहे. ज्या प्रथा स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणत आहेत, त्यामध्ये काळानुरूप काही बदल केले गेले आहेत. तरीही केवळ भारतातच नव्हे, तर इतर विकसित देशांतील स्त्रियांची स्थिती ही खूप चांगली नाही.

भारत असा देश आहे, जिथे महिलांना देवी मानले जाते. नवरात्रीमध्ये मुलींची पूजा केली जाते. आपल्या परंपरा आणि सहिष्णुतेमुळे या देशाने जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे, परंतु खऱया अर्थाने आजही आपण महिलांना आवश्यक तो सन्मान देऊ शकलो नाही. न जाणो किती मुली अजूनही शिक्षणाच्या हक्कांपासून दूर आहेत. स्त्रीभ्रूणहत्या केली जाते किंवा त्यांना विकले जाते, त्यांना ओझे मानले जाते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अजूनही मुली रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडू शकत नाहीत. ‘सातच्या आत घरात’ हा पायंडा फक्त मुलींसाठी पाडला आहे.

वर्षातून एकदा हा दिवस साजरा करून सन्मान मिळवण्यासाठी पुरेसा आहे का? महिलांचा सन्मान रोज केला असता तर कदाचित हा आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्याची वेळच आली नसती. आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एका दिवसासाठी साजरा केल्याने महिलांची स्थिती सुधारणार नाही. त्यांचा विकास होणार नाही. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी आपण महिलांना किती आदर दिला आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी किंवा विकासासाठी आपण कोणती पावले उचलली आहेत यावर अवलोकन होणे आवश्यक आहे. तरच खऱया अर्थाने महिलांना समाजात योग्य स्थान दिले जात आहे हे समजू शकेल. माताभगिनींना तुमच्या घरातूनच आदर आणि आपुलकी द्या. महिलांना योग्य सन्मान आणि हक्क मिळावेत यासाठी महिला व बाल कल्याण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र आपण या विभागावर विसंबून राहू शकत नाही. त्यासाठी स्वतःपासून स्वतःच्या, घरापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे कारण,

स्त्री म्हणजे ओथंबलेली माया…वनराईची छाया
स्त्री म्हणजे न आटणारा झरा…एक चमकता तारा
स्त्री म्हणजे दयेचा सागर…नयनांचा जागर
स्त्री म्हणजे सतत तेवणारा नंदादीप…संस्कार रूपाने झळकणारा

खुल्या मनाने मूल्यमापन केले तर महिलांना मिळालेल्या सन्मानानंतरही त्या दोन भागांत विभागल्या गेल्याचे दिसून येते. एका बाजूला पीडित, अशिक्षित स्त्रिया आहेत आणि दुसऱया बाजूला स्वतःच्या पायावर उभे राहून प्रगतीच्या वाटेवर असलेल्या महिला आहेत. अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा स्त्रिया प्रगतीची नवीन उंची गाठत आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली असली तरी महिलांना स्वप्रगतीसाठी अजूनही खूप काही करायचे आहे. घराबाहेर, व्यवसाय असो, साहित्य विश्व, प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा पोलीस खाते असो की हवाई सेवा, किंवा क्रीडांगण, सर्वच क्षेत्रांत महिलांनी यशाची पताका फडकवली आहे. स्त्रियादेखील अनेक राष्ट्रांच्या प्रमुख आहेत. देशाचा कारभार चालविण्याचे कार्य करतात. अशा प्रकारे महिलांना मिळालेले हे यश निश्चितच समाधान देते. अशा परिस्थितीत सशक्त समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी स्त्री-पुरुषांमध्ये वैर निर्माण होऊ नये, उलट सहकार्याचे संबंध वाढवले गेले पाहिजेत. सुशिक्षित आणि संपन्न महिलांनी मागासलेल्या महिलांसाठी जे काही करता येईल तेवढे करावे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष भर दिला पाहिजे. कारण महिलांच्या समस्या केवळ महिलाच चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यामुळे सुशिक्षित आणि समृद्ध महिला या दिशेने विशेष योगदान नक्कीच देऊ शकतात. यासंदर्भात पुरुषांनाही त्यांच्या कर्तव्याचे भान ठेवावे लागेल. तसे पाहिले तर पुरुष स्वतःही अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. विशेषतः बेरोजगारीच्या समस्येने. स्त्री-पुरुष एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून परस्पर सहकार्याच्या भावनेने समानतेने पुढे आले तरच समाजरचना मजबूत होईल आणि पर्यायाने राष्ट्रही मजबूत होईल.

(लेखिका श्रमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत.)