शिवसेना वसईतील ख्रिस्ती बांधवांच्या पाठीशी; उद्धव ठाकरे यांची ग्वाही

शिवसेना वसईतील ख्रिस्ती बांधवांच्या पाठीशी कायम असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. येथील धर्मगुरू, साहित्यिक तसेच अन्य विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठत व्यक्तींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी स्थानिक राजकारण तसेच समस्यांबाबत चर्चा केली.

वसई-विरारमध्ये ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी असून भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीला अनेक जण वैतागले आहेत. वसईतील पाणी प्रश्न, 29 गावे यांसह विविध प्रश्न असून त्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने ही भेट झाली.

या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, कवी सायमन मार्टीन, फादर ज्यो आल्मेडा, फादर मायकल तुस्कानो, शिलू परेरा, जॉर्ज डाबरे, बबन लोपीस, संजय गुरव, प्रथमेश राऊत, किशोर पाटील आदी उपस्थित होते.