मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा तिसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाचा तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी सहावा दिवस आहे. आता जरांगे यांची तब्येत खालावली असून त्यांनी औषधोपचारासाठीही नकार दिला आहे. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास जेवढा वेळ लावाल, तेवढे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तसेच 1 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी सोमवारी दुपारी ग्रामस्थांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली.

कोणतरी आमचे आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला सरसकट सर्व मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. फक्त ज्याचे पुरावे मिळाले, त्यांनाच प्रमाणपत्र घेण्यास आम्ही तयार नाही. आम्हाला सरसकट आरक्षण हवे आहे. आता मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत लढायचे आहे, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यातला मराठा हा एकच आहे. त्यामुळे सरसकट सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. ज्यांचे कागदपत्रे सापडली असतील, त्यांनाच आरक्षण देणार, असे चालणार नाही. असे अर्धवट आरक्षण आम्हाला नको, आम्हाला सरसकट आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. आरक्षण मिळपर्यंत मी हेआंदोलन थांबवणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

आम्ही चर्चेसाठी शिष्टमंडळ आणि माणसे पाठवली होती. मात्र, आमची माणसे फोडण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले असताना त्यांनी किंवा सरकारकडून आरक्षणाबाबत काहीही सांगितले नाही. असे असताना आपण त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार, असा सवालही त्यांनी केला. आरक्षण मिळेपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्टे केले. मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरून पाणी घेतले. मात्र, पाणी पिताना घशाला त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.