भाजप, आरएसएसला दिल्लीतून देश चालवायचाय

भाजप आणि आरएसएसला दिल्लीत बसून संपूर्ण देश चालवायचाय. एक भाषा आणि एक नेता असे त्यांचे विचार आहेत. मात्र काँग्रेस हे मानत नाही. आसामसह विविध राज्यांमधील सरकार त्या-त्या राज्यांमधूनच चालवले जावे, अशी काँग्रेसची विचारधारा आहे, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसामच्या लखिमपूर जिह्यात असून गोगामुख येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ब्रम्हपुत्रा नदीतून नावेतूनही त्यांनी प्रवास केला आणि श्री श्री औनियातीचे दर्शन घेतले.  सर्व राज्यांना समान दर्जा दिला गेला पाहिजे. त्यामुळेच ईशान्येकडील मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आणि पश्चिमेकडे मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे, असे त्यांनी सांगितले.