पालघरमध्ये उष्माघाताने विद्यार्थिनीचा बळी

पालघरमध्ये उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. अश्विनी रावते या 16 वर्षीय विद्यार्थिनीला उष्माघाताने भोवळ आल्याने ती कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.  ही घटना विक्रमगड तालुक्यातील केव वेडगे पाडा येथे घडली. अश्विनी ही मनोर येथील एस पी मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. आज दुपारी अकरावीचा पेपर देऊन अश्विनी घरी आली. परंतु घरी कोणीच नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडली. नदीजवळ येताच तिला रणरणत्या उन्हाने भोवळ आली, आणि ती शेतात कोसळली. शेत घरापासून लांब असल्याने आणि उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी कोणीच बाहेर पडत नसल्याने अश्र्विनीचा मृतदेह तिथे तब्बल दोन तास पडून होता. आई वडील घरी आले, तेव्हा त्यांना अश्विनी दिसली नाही म्हणून ते तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले तेव्हा तिचा मृतदेह नदीजवळील शेतात पडल्याचा  दिसला.