वऱ्हाडी ‘वेटिंग’वर, तर नवरदेव ‘वोटिंग’ सेंटरवर; मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला निघाली वरात

>> प्रसाद नायगावकर

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली असताना बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवही मतदानासाठी केंद्रावर पोहोचला आहे. मतदानाच्या दिवशीच विवाहाचा मुहूर्त असल्याने दिग्रसच्या संदेश अस्वार या तरुणाने शुभमंगल सावधान… होण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान करणे हे लोकशाहीतील एक महान सोहळा असतो. दर पाच वर्षांनी येणारा हा उत्सव सोहळा संपन्न करण्याची सर्वांचीच इच्छा असते. त्यातही देशाच्या सर्वोच्च सांसदीय प्रणाली कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणजेच खासदार निवडीचा हा सुवर्ण काळ कोणालाही गमवायचा नसतो. निवडणुकीची घोषणा व्हायच्या आधीच संदेश अस्वार व प्रज्ञा सुने यांचा विवाह सोहळ्याची तारीख निघाली. मात्र मतदानाच्या दिवशीच लग्नाचाही मुहूर्त आल्याने संदेश अस्वार व परिवाराची मात्र पंचाईत झाली.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस संदेश अस्वार याचा विवाह अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील प्रज्ञा सुने हिच्याशी ठरला. विवाह स्थळ व मतदान केंद्र यातील अंतर जवळपास 130 किलोमीटरचे होते. लग्न विधी पार पाडायचे की मतदान करायचे या द्विधा मनस्थितीत असणाऱ्या संदेशने एक महत्वाचा निर्णय घेतला.

“आधी लग्न लोकशाहीचे… मग माझे…” हा निर्णय समस्त मतदारांना अनमोल संदेश देणारा ठरला आहे. आज सकाळी मतदान करून वर आपली वरात त्याने अमरावती येथे नेली आहे. संदेशच्या या निर्णयाचे समस्त लोकशाही प्रेमींनी स्वागत केले असून संदेश अस्वार व परीवाराचे कौतुक होत आहे.

मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, इतर नागरिकांनी देखील या अनोख्या विवाहाचा आदर्श घेत देशाप्रती असलेले कर्तव्य मतदान करून पार पडण्याची गरज आहे. निवडणुकीविषयी बोलताना संदेश यांनी सर्व मतदारांना “आधी मतदान, नंतर जलपान” असे आवाहन केले आहे.