मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देऊ नये, अशी छगन भुजबळ यांची मागणी आहे. या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी त्याची खूप गडबड चालू आहे, असे म्हणत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर टीका केली होती. या टीकेला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंगोली येथे ओबीसी एल्गार सभेत ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, ते नवीन नेते आता नवीनच काहीतरी बोलत आहेत. भुजबळ म्हातारे झालेत असे ते म्हणाले. अरे बाबा हो! झालोय म्हातारा, सगळेच होणार आहेत. तुझे माता-पिता म्हातारे झाले असतील. तूसुद्धा म्हातारा होशील. मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. आंदोलन माझ्यासाठी नवीन नाही, असे प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिले आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले, या लोकांनी बीड पेटवले. यांना मला सांगायचं आहे की पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, असेही भुजबळ म्हणाले.