शिंदेंना दिलं जाणारं ‘अवास्तव महत्व’ भाजपला रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला – राज ठाकरे

अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांनी बंड करत ते भाजप मिंधे गटाच्या सरकारमध्ये सामिल झाले आहेत. अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजकारणातील या घडामोडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

”आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र भाजपला शिंदेंची साथ नको असल्याची बाब राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये अधोरेखित केली आहे. यामुळे संपूर्ण मिंधे गटाची चिंता वाढीस लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.