अभिनेत्री राधिका आपटे झाली मुंबई विमानतळावर लॉक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘ना पाणी, ना वॉशरुम…’

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिला मुंबई विमानतळावर एक भयानक अनुभव आला आहे. हा अनुभव तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. विमानत प्रशासनामुळे झालेल्या गैरसोयीचा पाढाच यात राधिकाने वाचला आहे.

राधिका आपटे हिने भलीमोठी पोस्ट शेअर केली असून तिच्यासह इतर प्रवाशांसोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. यासोबत तिने काही फोटो आणि व्हिडीओही शेअर केले आहेत. यात राधिकासह अनेक प्रवासी दिसत असून त्यामध्ये लहान मुलांसह, महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे. प्रत्येकजण दरवाजातून बाहेर बघत असून नक्की काय सुरुय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

अखेर मला ही पोस्ट करावीच लागत आहे. आज सकाळी साडे आठ वाजता माझी फ्लाईट होती. आता 10 वाजून 50 मिनिटं झाले आहेत. तरीही अद्याप फ्लाईटचा पत्ता नाही. फ्लाईट डिटेल्समध्ये प्रवाशांनी बोर्ड केल्याचे दर्शवले जात आहे. मात्र प्रवाशांना एरोब्रिजमध्ये ठेवण्यात आले असून सर्वांनी बंद करण्यात आले आले. लहान मुलांसह वृद्ध प्रवासी एक तासांहून अधिक काळापासून आत बंद असून सुरक्षारक्षक दरवाजेही उघडण्यास तयार नाहीत. कर्मचाऱ्यांनाही काहीच माहिती नाही. फ्लाईटचे क्रू मेंबरली आलेले नाहीत. शिफ्ट बदलल्याने ते दुसऱ्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत आहेत. ते येथील की नाही माहिती नाही, पण आम्हाला आत कितीवेळ बंद करून ठेवणार याचीही माहिती नाही, असे राधिका आपटे हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

नुकतीच मी बाहेर अत्यंत मूर्ख महिला कर्मचाऱ्यांशी बोलून आले. इथं काय सुरुय असे विचारले तर ती काहीच समस्या नसून उशीरही झाला नसल्याचे म्हणाली. आता आम्ही आत बंद असून किमान 12 वाजेपर्यंत इथेच असू. सर्वच बंद आहे. इथं वॉशरुमची आणि पाण्याचीही सोय नाही. या मजेशीर प्रवासासाठी धन्यवाद, असेही राधिकाने म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

दरम्यान, राधिका आपटे हिच्या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंट केल्या आहेत. अभिनेता सुयश टिळक याने ‘मुंबई विमानतळ हे दिवसेंदिवस खराब होत आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहेत, तर अभिनेत्री अमृता सुभाषने यावर ‘अरे देवा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही चाहत्यांनी तिला ‘काळजी घे’ असेही म्हटले आहे.