सामना अग्रलेख – इतिहास म्हणजे बोगस डिग्री नाही!

भारतात गेल्या 70 वर्षांत काहीच घडले नाही. जे काही केले ते 2014 नंतर मोदींनीच, असे धडे भाजपच्या नव्या व्हॉटस्अ‍ॅप विद्यापीठात दिले जातात. कंगनासारख्या विद्यार्थिनी त्याच विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या असल्याने त्यांच्या फेकाफेकीमुळे देशाची मती व बुद्धी याबाबत उगाच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. मुळात नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भाजप विचारांशी सुतराम संबंध नव्हता. भारताच्या जाज्वल्य इतिहासात संघाला स्थान नाही. भाजपचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. या न्यूनगंडाने पछाडलेले लोक आज सत्तेवर आहेत व त्याच न्यूनगंडातून ते चुकीच्या इतिहासाचे बनावट दाखले निर्माण करीत आहेत. भारताचा इतिहास म्हणजे पंतप्रधानांची बोगस डिग्री नाही व जुमलाही नाही. तूर्त इतकेच.

भारतीय जनता पक्षाच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे किंवा ज्यांच्या अकलेने माती खाल्ली आहे, ज्यांची अक्कल माती खातेय, अशांनाच भाजपमध्ये भवितव्य आहे. कंगना राणावत हिने भाजपमध्ये प्रवेश करून हिमाचल प्रदेशातून लोकसभेची उमेदवारी मिळवली. कंगनाने आता प्रश्न विचारला की, सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान का केले नाही? ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले, त्यांना गायब का केले? त्यांना भारतात येण्यापासून कोणी रोखले? मुळात कंगनाचा भारतीय इतिहासाशी संबंध आला नाही. कंगनाच्या मते देश स्वतंत्र झाला, तो मोदी पंतप्रधान झाल्यावर. म्हणजे 2014 साली. त्याआधी हा देश गुलामगिरीत होता व त्या अर्थाने कंगना वगैरे लोक हेच खरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्याबद्दल त्यांना ताम्रपट देऊन बावनकुळय़ांनी तिचा सत्कारच केला पाहिजे. कंगनाला नेताजी बोस यांच्यासंदर्भात जो प्रश्न पडला आहे, त्याचे उत्तर शाळकरी पोरही देईल. बोस यांचा अपघाती मृत्यू 18 ऑगस्ट 1945 ला झाला. त्यांच्या अस्थी सप्टेंबर 1945ला जपानला पोहोचल्या. बोस यांचे निधन झाले तेव्हा गांधी-नेहरू, सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढा शिगेला पोहोचला होता. पण या काळात नेताजी बोस यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बोस कोठे होते? हा प्रश्न निरर्थक आहे. ब्रिटिशांना ‘भारत छोडो’, ‘चले जाव’चा इशारा दिला होता व त्या लढय़ात भाजपचे तेव्हाचे मायबाप कोठेच नव्हते. उलट भाजप ज्यांना आज ‘बाप’ मानतो ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे प. बंगालातील मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात सामील झाले होते व ‘चले जाव’ चळवळीमुळे देशात कायदा-सुव्यवस्थेची चिंता निर्माण झाल्याने हे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून चिरडून टाका असा पत्रव्यवहार ब्रिटिशांशी करीत होते. आता कंगनाने प्रश्न विचारला पाहिजे की, श्यामाप्रसाद बाबूंना देशाचे पंतप्रधान का केले नाही? मुखर्जी हे भाजपचे ‘बाप’ असले तरी ते देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात नव्हते व सुभाषचंद्र बोस यांचा

भाजपला पुळका

अचानक आला असला तरी नेताजी हे संघाशी संबंधित नव्हते हे कंगनाने समजून घेतले पाहिजे. कंगनाने ‘टाईम्स नाऊ’च्या मुलाखतीत आणखी एक अक्कल पाजळली. सरदार पटेल यांना इंग्रजी येत नसल्यानेच त्यांना पंतप्रधानपदावर बसता आले नाही. सत्य असे आहे की, सरदार पटेल हे उच्चशिक्षित होते. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. सरदार पटेल यांनी 1913 मध्ये इंग्लंडच्या Inns of court कडून आपली कायद्याची पदवी घेतली. सरदार पटेल यांचा मृत्यू 1950 साली झाला. भारतात पहिली लोकसभा निवडणूक 1951-52 मध्ये झाली. त्यामुळे भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची मोडतोड करू नये. अर्थात मुंबई ही पाकव्याप्त कश्मीर असल्याची मुक्ताफळे उधळणाऱया कंगनाकडून शहाणपणाची काय अपेक्षा करणार? विश्वगुरूंकडून त्यांच्या चेल्यांना हे असे अर्धवट ज्ञान वाटले जात आहे. महाराणा प्रतापच्या चेतक घोड्याची आई गुजराती होती, असा शोध पंतप्रधान मोदी यांनी लावला. गटारात नळी टाकून गॅसनिर्मिती करता येईल असेही त्यांनी सांगितले. अलीकडच्याच एका प्रचार सभेत आपले ‘ग्यानी’ मोदीजी म्हणतात, ‘‘अभी अभी मैं हेलिकॉप्टर से बाय रोड आया.’’ मोदींसाठी कोणी हवेत सिमेंटचा रस्ता बांधला काय? पण कितीही जोरदार फेकाफेकी केल्यावर टाळ्या पिटणारे व माना डोलवणारे अंधभक्त मिळाल्यावर ‘थापा’ मारण्याची नशा वाढतच जाते. गुरू व चेले त्या नशेत धुत होतात. महामारी कोरोनाही टाळ्या वाजवून व रस्त्यावर थाळय़ा वाजवून पळून जाईल, असा सल्ला देणाऱ्या पंतप्रधानांच्या सहवासातच कंगनासारखे लाखो ज्ञानी तयार झाले आहेत. देशातील 33 कोटी देवांचे अस्तित्व 2014 नंतर संपले असून मोदी हेच विष्णूचे तेरावे अवतार म्हणून जन्माला आल्याचे त्यांच्या भगतगणांना वाटते व याच भगतगणांनी 2014 नंतरचा नवा भारत निर्माण केला. त्या नव्या भारताचा इतिहास नवा आहे, पण भूगोल तोच आहे व त्या भूगोलावर सध्या रक्ताचे सडे पडले आहेत. लडाखचा भाग चीनने काबीज केला आहे. मणिपुरातील हिंसाचार थांबलेला नाही. मोदी हे रोजच

खोटय़ा आश्वासनांचा धुरळा

उडवत आहेत व तो धुरळा म्हणजे राष्ट्रीय सुगंधाची बरसात असल्याचे कंगनासारख्यांना वाटणे साहजिक आहे. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेकार तरुणांना पकोडे तळण्याचे अर्थशास्त्र सांगतात. 2014 नंतर स्वतंत्र झालेल्या विकसित भारताचे हे धोरण आहे. मोदी यांनी त्यांचा नवा भारत खोटेपणा व फेकाफेकीच्या पायावर उभा केला. त्या नव भारतात कंगनासारखी बालके बागडतात व आनंद घेतात. त्यांच्या निरागस वागण्या-बोलण्यावर कोणी शंका घेऊ नये. देशात सध्या असत्याचा बोलबाला आहे. त्यामुळे ‘असत्यमेव जयते’ हेच मोदींच्या जीवनाचे सूत्र आहे व आपल्या खोटेपणावर लोकांनी विश्वास ठेवावा असे त्यांना वाटत असले तरी देशातील सर्वच जनता ‘कंगना’बुद्धीची नाही व भाजपच्या म्हणजेच मोदींच्या खोटेपणाबद्दल ती मोदींना प्रश्न विचारून भंडावून सोडते. मोदींचे वैवाहिक जीवन, मोदींची डिग्री, मोदींचे चहा विकणे, मोदींचे भीक मागून जगणे, मोदींचा भ्रष्टाचारविरोधी तथाकथित लढा, ‘न खाऊंगा न खाने दूंगा’सारख्या गर्जना, पाकव्याप्त कश्मीर पुन्हा जिंकून आणण्याच्या वल्गना, काळा पैसा नष्ट करण्याचे दाखविलेले स्वप्न हे सर्व कसे एकजात झूठ होते हे आता उघड झाले. भारतात गेल्या 70 वर्षांत काहीच घडले नाही. जे काही केले ते 2014 नंतर मोदींनीच, असे धडे भाजपच्या नव्या व्हॉटस्अॅप विद्यापीठात दिले जातात. कंगनासारख्या विद्यार्थिनी त्याच विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या असल्याने त्यांच्या फेकाफेकीमुळे देशाची मती व बुद्धी याबाबत उगाच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. मुळात नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचा भाजप विचारांशी सुतराम संबंध नव्हता. भारताच्या जाज्वल्य इतिहासात संघाला स्थान नाही. भाजपचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. या न्यूनगंडाने पछाडलेले लोक आज सत्तेवर आहेत व त्याच न्यूनगंडातून ते चुकीच्या इतिहासाचे बनावट दाखले निर्माण करीत आहेत. भारताचा इतिहास म्हणजे पंतप्रधानांची बोगस डिग्री नाही व जुमलाही नाही. तूर्त इतकेच.