Lok Sabha Election 2024: ची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशात मोदी सरकारविरोधात जनमत तयार होत असताना भाजप सत्ता टिकवण्यासाठी विविध पक्षातून आलेल्यांना तिकीट देत आहे. तर दुसरीकडे INDIA आघाडी देशात लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी मोदीसरकार विरोधातील पक्षांची मोट बांधत आहे. अशातच उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांचेही प्रयत्न सुरू असून तिकीट न मिळाल्यास जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. बिहारमध्ये सध्या तेच वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपची पक्षातील घुसखोरी, बाहेरून आलेल्यांना तिकीट आणि निष्ठावंतांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करताना लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) म्हणजेच LJP मध्ये झालेल्या उलथापालथीत पक्षाच्या 22 नेत्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत. पद सोडणाऱ्या व्यक्तींमध्ये माजी मंत्री रेणू कुशवाह, माजी आमदार आणि LJP चे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश कुमार, राज्य संघटना मंत्री रवींद्र सिंह, अजय कुशवाह, संजय सिंह आणि प्रदेश सरचिटणीस राजेश डांगी यांचा समावेश आहे.
पैशाच्या बदल्यात तिकीट वाटप केल्याच्या आरोपांसह, पक्षांतर्गत तक्रारींमुळे राजीनाम्याची लाट आल्याचं दिसून येत आहे.
पक्षाच्या राजीनाम्यावर माजी खासदार रेणू कुशवाह म्हणाल्या, ‘तिकीट बाहेरच्या लोकांना न देता पक्षाच्या कार्यकर्त्यांना द्यायला हवं. बाहेरच्या लोकांना तिकिटं देण्यात आली याचा अर्थ तुमच्या पक्षात सक्षम लोक नाहीत. आम्ही कशासाठी आहोत? तुमच्या पक्षातील लोकांनी कामगारांसारखं काम करून तुम्हाला नेता बनवायचं एवढं आमचं काम आहे का? बाहेरच्या व्यक्तीला तिकीट दिल्यावर आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आम्ही पक्षासाठी मजूर म्हणून काम करण्यासाठी नाही’.
तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार आणि LJP चे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश कुमार यांनी प्रतिपादन केलं की बंडखोर LJP नेते आता INDIA आघाडीला पाठिंबा देतील.
‘देशात अशा महत्त्वाच्या निवडणुका असताना, LJP च्या अध्यक्षांनी अशा लोकांना तिकीट दिलं की पक्षाचे कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. जे लोक रात्रंदिवस ‘जय चिराग पासवान’च्या घोषणा देत होते आणि ‘नव्या बिहार’ची आशा बाळगत होते त्यांचा ‘विश्वासघात झाला, त्यांच्या आकांक्षांचा चुराडा झाला. आता देश वाचवायचा असेल तर INDIA आघाडीला साथ द्यावी लागेल. आता आम्ही भारत आघाडीला पाठिंबा देऊ’, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
पक्षाचे संघटन सचिव रवींद्र सिंह यांनी दावा केला की चिराग पासवान यांनी ‘तिकीट विकले’. ‘चिराग पासवान यांनी बिहारच्या लोकांशी भावनिक खेळ केला आहे. आमच्या मेहनतीमुळे जेव्हा त्यांना पाच जागा मिळाल्या तेव्हा त्यांनी ती सर्व तिकिटे विकली. बिहारची जनता त्यांना उत्तर देतील’, असा इशारा त्यांनी दिला.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी पाच जागा लढवत आहे – वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई अशा या जागा आहेत.
बिहारमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जून रोजी होणार आहे.