नागपुरात युवक काँग्रेसचा मोर्चा; नाना पटोलेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात युवक काँग्रेसचा मोठा मोर्चा विधान भवनाच्या दिशेला निघाला होता. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन आंदोलक तरुण आक्रमक झाले होते. आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चातील तरुणांचा संताप बघत पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते. पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. पटोले यांनी आंदोलनामागील कारण सांगितले.

हे सरकार तरुणांचा आवाज दाबत आहे. तरुणाईला बरबाद करण्याचे काम सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते, त्यावेळीही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटले. नोकऱ्या दिल्या नाहीत. महाराष्ट्रात लाखो पदे रिक्त आहेत. कंत्राटी भरतीच्या नावाने तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्याविरोधात युवक काँग्रेसने तरुण-तरुणींचा मोर्चा विधान भवनावर काढला आहे. सरकारला याचे उत्तर द्यावेच लागेल, असे नाना पटोले म्हणाले.

आम्ही सगळे जेलभरु आंदोलन करू. मात्र, आता या सरकारशी दोन हात केल्याशिवाय युवक काँग्रेस शांत बसणार नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे सरकार तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले आहे. पोलीस दलातही मोठी पदे रिक्त आहेत. सर्व विभागात पदे रिक्त असताना ऑनलाईनच्या नावाने तरुणांना लुटले जात आहे. हे चीट फंडवाले सरकार आहे. या सरकारने पिढी बदनाम करण्याचे काम केले. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणं साहजिक आहे, असे पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रात 25 लाख पदे रिक्त आहेत. सरकार ही पदे भरायला तयार नाही. त्यामुळे तरुणांचा हा उद्रेक बघायला मिळत आहे. शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही बॅरिकेट्स काय सरकारच्या भिंती तोडून त्यांच्या छातडावर बसून न्याय मिळवून देऊ, असेही पटोले म्हणाले.