मुंबई बाजार समितीतील घोटाळय़ाशी माझा आणि संचालकांचा संबंध नाही; आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना फटकारले

‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या घोटाळ्याचा उल्लेख विरोधक करीत आहेत, त्याच्याशी माझा आणि संचालकांचा काडीमात्र संबंध नाही. ऐन लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघामध्ये खासदार शरद पवार यांच्या पाठीशी मोठय़ा संख्येने जनता उभी राहिली आहे, हे पाहून विरोधक षडयंत्र रचून माझ्यावर आरोप करीत आहेत,’ अशी टीका महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. मुंबई बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यावेळी उपस्थित होते. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समितीच्या अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. खोटे आरोप करणाऱयांविरोधात निवडणुकीनंतर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही शिंदे यांनी दिला.

आमदार शिंदे म्हणाले, ‘निवडणुका आल्या की, आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, सध्या यंत्रणेचा वापर करून राजकीय विश्वासार्हता संपविण्याचा घाणेरडा प्रयत्न आरोप करणाऱयांकडून होत आहे. ज्या चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत आरोप करणारे बोलत आहेत, त्याबाबत दोषी कोण आहेत, हेच ठरलेले नाही. मी आत्तापर्यंत सुसंस्कृत राजकारणाचा प्रयत्न केला. माणूस मोठा झाला की, काही लोकांमध्ये असूया निर्माण होते. सरकारी यंत्रणेचा वापर करून बाजार समितीतील घोटाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे न्यायदेवतेकडे न्याय मागावा लागला.’

‘बाजार समितीतील आमचे संचालक मंडळ 2008मध्ये अस्तित्वात आले आहे, तर व्यापाऱयांना गाळेवाटप हे 1990मध्ये झालेले आहे. या व्यापाऱयांना बाजार समितीतील त्यांचा वाढीव एफएसआय हवा होता. त्यामुळे त्यांनी बाजार समितीकडे अर्ज केला होता. बाजार समितीच्या संचालक मंडळाने त्याच्यावर ठराव करून तो पणन मंत्रालयाला पाठविला होता. तत्कालीन पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर सिडको, महापालिकेला योग्य तो कर भरला होता आणि बाजार समितीने व्यापाऱयांकडून चेकने पैसे घेऊन ते खात्यावर भरले आहेत. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, मग विरोधक चुकीचे आरोप कशासाठी करीत आहेत?’ असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला.

कमीपणा येणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी

‘कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आजवर शंकरराव जगताप, शालिनीताई पाटील, शशिकांत शिंदे अशा अनेक दिग्गज मंडळींनी केले; पण इतका बालिश व भंपक लोकप्रतिनिधी कोरेगाव तालुक्याने पाहिला नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही परिस्थिती बघायला मिळते आहे. अशा बालिश व भंपक लोकप्रतिनिधीमुळे आपल्याला कमीपणा येणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी,’ असे मुंबई बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी सांगितले.