सामना अग्रलेख – ‘इंडिया’ची गरुडझेप! भयमुक्त भारत

देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मूकश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठीइंडियाआघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी हीइंडियाची वज्रमूठ सज्ज आहे. राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी इंडियाचा गरुड पक्षी झेपावला आहे! मुंबईतील बैठकीचा तोच संदेश आहे!

 ‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. मुंबईत तिसऱ्या बैठकीचे आयोजन आज व उद्या होत आहे. भाजपने इंडिया आघाडीची इतकी धास्ती घेतली की, स्वयंपाकाचा गॅस 200 रुपये स्वस्त केला. बैठका वाढत जातील तशी ही स्वस्ताई वाढत जाईल. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची ही कमाल आहे. तीन वर्षांत स्वयंपाकाचा गॅस 1103 रुपयांवर जाऊन पोहोचला. तो ‘इंडिया’ आघाडीचा जोर वाढल्यावर खाली आला. ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील प्रमुख नेते मुंबईत उतरले आहेत. लालू यादव पाटण्याहून मुंबईला निघाले तेव्हा विमानतळावर त्यांना पत्रकारांनी विचारले, ‘मुंबईत का निघाला आहात?’ लालूंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले, ‘मोदींच्या नरडय़ावर बसण्यासाठी!’ मोदी ही व्यक्ती नसून लोकशाहीचा मुडदा पाडणारी हुकूमशाही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीशी हा लढा आहे. ‘पी.एम. मोदी की गर्दन पर चढने जा रहे है!’ असे लालू यादव सांगतात. ही लोकांची संतप्त भावना आहे. त्याच संतापाच्या ठिणगीतून ‘इंडिया’ आघाडीचा जन्म झाला आहे. पंतप्रधान मोदी हे अचानक विश्वगुरू बनले आहेत. ते ब्रिक्स संमेलनासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले, पण तेथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीच सरबराई यजमान देश करीत होते व आमच्या पंतप्रधानांना फार महत्त्व मिळाले नाही हे धक्कादायक आहे. मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तेथे भेट घेतली व चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवर नाराजी व्यक्त केली. पण

मोदींची पाठ वळताच

चिन्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने आपल्या देशाचा नवा नकाशा जाहीर केला. त्यात अक्साई चीनबरोबर अरुणाचल प्रदेशलाही चीनचा भाग दाखवला. चीनने लडाखची जमीन आधीच गिळंकृत केली आहे. चीन भूतानजवळ त्यांच्या वसाहती बनवत आहे. श्री. मोदी यांनी त्याच चिनी राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या ‘जी-20’ संमेलनासाठी खास आमंत्रित केले व पुन्हा एकदा मोदी व जिनपिंग अहमदाबादेत झोपाळय़ावर बसून ढोकला, गाठय़ा खातानाचे फोटो प्रसिद्ध होतील, पण भारताची जमीन रोज ओरबाडणाऱ्या या चिनी सैतानाला भारतात ‘जी-20’साठी बोलावू नये व आमच्या सैनिकांचा अपमान करू नये अशी जोरदार मागणी आता उठू लागली आहे. लोक आता मोदींना प्रश्न विचारीत आहेत. ही हिंमत ‘इंडिया’ आघाडीने निर्माण केली व ‘इंडिया’ आघाडी देशातील हुकूमशाहीला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास लोकांना वाटत आहे. चीनच्या आक्रमणाचा विषय अत्यंत गंभीर आहे. त्या आक्रमणावर मोदी-शहा काहीच बोलायला तयार नाहीत. ‘चांद्रयान-3’ चंद्रावर उतरले व त्या भूमीला पंतप्रधानांनी ‘शिवशक्ती’ असे नाव दिले. पण चीनने लडाख तोडला, अरुणाचलवर दावा सांगितला. भारतमातेचे लचके असे तोडले जात असताना चंद्रावरच्या जमिनीचे मोल ते काय? चंद्रावर जायचे तेव्हा जाऊ, पण आधी चीनची घुसखोरी थांबवा. 200 रुपयांनी गॅस सिलिंडर स्वस्त केल्याने चीनच्या घुसखोरीचा विषय मागे पडेल असे मोदींना वाटत असेल तर ते चूक आहे. ‘इंडिया’ आघाडीमुळे देशभक्तीची ठिणगी पडली आहे व भाजपप्रमाणे हे

ढोंगी देशप्रेम

नाही. मणिपूर आजही धुमसते आहे. हरयाणात भाजपच्या लोकांनी आगी लावल्या. देशभरात वणवा पेटवून त्यांना निवडणुकांना सामोरे जायचे आहे, पण ‘इंडिया’ आघाडी हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही. ‘इंडिया’ आघाडीची ऐक्याची वज्रमूठ हळूहळू घट्ट होत आहे. 27 पक्ष एकत्र आले व त्यांच्यात कोणतीही ईर्षा नाही. भारतीय जनता पक्षाने कितीही टीका केली तरी ‘इंडिया’ आघाडी ही एक स्फोटक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला 2024 च्या आधीच उलथवून टाकेल अशी भीती त्यांना मनातून वाटते. ही भीती त्यांच्या कृतीवरून आणि अस्वस्थ हालचालींवरून दिसते. राहुल गांधींना देशभरात प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झंझावात आहे. ईडी, सीबीआयला घाबरायचे नाही व झुकायचे नाही. ‘आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. हिंमत असेल तर टाका आत,’ अशी हिंमत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखवली. हेच ‘इंडिया’ आघाडीचे यश आहे. देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी ही ‘इंडिया’ची वज्रमूठ सज्ज आहे. राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे! मुंबईतील बैठकीचा तोच संदेश आहे!