लेख – एआय टीचर : क्रांती की संकट?

>> महेश कोळी

अलीकडेच भारताला पहिली एआय शिक्षिका मिळाली. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील एका खासगी शाळेत सादर केलेली आयरिस नामक ही रोबो शिक्षिका तीन भाषेत बोलू शकते. विद्यार्थ्यांशी संवाद साधते आणि हस्तांदोलन करते. विशेष म्हणजे या मशिनरूपी शिक्षकाला कोणताही पगार नको, त्याला फक्त बसविलेली बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे. पण मग यामुळे शिक्षकांच्या रोजगारावर टाच येईल का? शिक्षकांची भूमिकाच संपुष्टात येईल का?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा आज जागतिक पटलावरील चर्चेचा केंद्रबिंदू ठरू पाहात आहे. एआयच्या क्षेत्रात प्रगत राष्ट्रांप्रमाणेच भारतही प्रयत्नशीलपणाने आघाडी घेत आहे. अलीकडेच भारताला एआय शिक्षिका मिळाली. ही बाब भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी आहेच, त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या पातळीवर देशाचे हे अभूतपूर्व यशही मानावे लागेल. केरळच्या तिरुअनंतपूरम येथील एका खासगी शाळेत सादर केलेल्या रोबो शिक्षिकेचे नाव आयरिस आहे. ही शिक्षिका चॅटजीपीटीसारख्या एआय तंत्रज्ञानयुक्त असून तिच्याकडे गणित, विज्ञान यांसारख्या विषयांच्या प्रश्नांना काही मिनिटांतच उत्तर देण्याची क्षमता आहे. तीन भाषेत बोलू शकणारी एआय शिक्षिका साडीचा पेहराव वावरते. तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि हस्तांदोलनही केले. शिक्षण क्षेत्रात एआय वापराचे हे एक अनोखे उदाहरण मानावे लागेल.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. ब्रिटनच्या एका शाळेने एआय चॅटबॉटला प्रिन्सिपल हेड टीचर केले आणि विद्यार्थांनादेखील एआय आधारित पर्सनल असिस्टंट देण्यात आला. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश किती मर्यादेपर्यंत करायला हवा, या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर फार डोकं खाजवण्याची गरज नाही. आपल्या बुद्धिमत्तेचे घोडे पळवून एक तार्किक विचार करण्याची आवश्यकता आहे. विचार करा, एखाद्या विद्यालयास किंवा महाविद्यालयाला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त रोबो शिक्षकांच्या भरवशावर सोडता येऊ शकते का? किंवा असे पाऊल उचलत विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंतामुक्त होता येईल का? या प्रश्नांवर आपण मंथन केले तर त्याचे उत्तर नकारात्मकच राहील. कारण ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित रोबो शिक्षक हा एक उच्च कोटीचे अल्गोरिदम आणि उच्च प्रतीची माहितीची क्षमता राखणारे मशिन आहे. विविध प्रश्नांची उत्तरे कदाचित रोबो शिक्षक देऊ शकेल, परंतु खरा कस वैचारिक आणि सर्जनशीलतेच्या पातळीवर लागेल. त्यावेळी रोबो यंत्रणेतील उणिवा समोर येतील. याचे कारण अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती यात जमीन आस्मानचा फरक आहे. एआय आधारित मशीन ही प्रत्यक्षातील शिक्षकाचे स्थान कधीही घेऊ शकत नाही. कारण अभ्यासक्रमातील विषयावर विचार करणे, ते समजून घेणे आणि त्यातील तार्किकता मांडण्याची क्षमता सध्याच्या रोबोकडे नाही. कोणत्याही विषयाला चांगल्या रीतीने समजून सांगण्यासाठीदेखील वैचारिक शक्तीचा आणि क्षमतेचा वापर करण्याची नितांत गरज असते. त्याचप्रमाणे मातीचा गोळा असणाऱया विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलनशक्तीनुसार, वयोगटानुसार, प्रांतानुसार, लोकसंस्कृतीनुसार अभ्यासक्रमातील विषय संवेदनशीलपणाने मांडण्यासाठीची मानवी भावनाशीलता रोबो टीचरकडे नसते.

असे असले तरी रोबो टीचरमुळे शिक्षकी पेशावर काहीच फरक पडणार नाही, असे म्हणता येणार नाही. एका आकडेवारीनुसार, एआय 2030 पर्यंत 30 कोटी नोकऱयांवर गंडांतर येऊ शकते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात मांडलेले मतदेखील हेच सांगते की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक तंत्रज्ञानातील क्रांती आहे आणि ती उत्पादन क्षमता, जागतिक उत्पन्न आणि विकासाला चालना देईल, परंतु हीच तंत्रज्ञान क्रांती बेरोजगारी निर्माण करू शकते आणि असमानतेची दरी अधिक व्यापक करू शकते. शेवटी या सर्व अहवालाचे निष्कर्ष काय? भविष्यकाळात शिक्षकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल का? एका निर्जीव मशिनमुळे बेरोजगारी वाढेल का? इथे एकच गोष्ट दिसते ती म्हणजे मशिनरूपी शिक्षकाला कोणताही पगार नको, त्याला फक्त आणि फक्त बसविलेली बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे. अर्थात शिक्षक म्हटलं तर पगार आला. त्यामुळे शाळेचा बजेटचा बराचसा भाग शिक्षकांच्या वेतनावर खर्च होतो. मानव आणि मशिन यांच्यातील आणखी काही फरकांचा विचार केला तर मशिनरूपी शिक्षक हा विद्यार्थ्यांना एकच विषय अनेकदा शिकवू शकतो आणि तोही कोणताही कंटाळा न करता! याउलट मानवी शिक्षकाला एकच मुद्दा किंवा धडा पुनः पुन्हा शिकवताना मानसिक तणावाला सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ शकते.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे एआय आधारित मशिन शिक्षक हा वास्तविक बुद्धीवर आधारित मानवी शिक्षकाच्या तुलनेत उत्तम सिद्ध होतो, पण मानवतेचे स्थान मशिन कधीही घेऊ शकत नाही.
तंत्रज्ञान हे दुधारी तलवार मानले जाते. त्याच्या नेहमीच दोन्ही बाजू दिसल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातदेखील आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सकारात्मक बाजूंचा विचार करायला हवा. शिक्षकांच्या जागी मशिन नेमणे हे सर्वार्थाने चुकीचे आहे, मात्र शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने एआय सहाय्यक उपलब्ध करून दिल्यास ते संयुक्तिक राहू शकते. हेदेखील आव्हानात्मक आहे. कारण विद्यार्थ्यांना एआयसारख्या सुविधांची मोकळीक दिली तर मुले किरकोळ समस्या सोडविण्यासाठीदेखील एआयकडे धाव घेत राहतील. परिणामी स्वतः एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे किंवा एखादे रचनात्मक पद्धतीने कार्य पुढे नेण्यासंदर्भात त्यांच्या अंगी असणारी प्रतिभा हळूहळू कमी होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले आणि वाईट याची ओळख पटविण्याबरोबरच सकारात्मक आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी तंत्र योजना आखली पाहिजे. शिक्षकांना कृत्रिम बद्धिमत्तेचा आधार केवळ ज्ञान वृद्धिंगत आणि विषयांची सखोल माहिती घेण्यापुरतीच असायला हवा. कितीही उच्च तंत्रज्ञानयुक्त मशिन आले तरी जिवंत शिक्षकांचा मुकाबला कोणी करू शकत नाही, हे सिद्ध करायला हवे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात करायला हवा. तात्पर्य एवढेच की, शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग हा नक्कीच शिक्षणाचे स्वरूप आणि स्तर यात आमूलाग्र बदल घडवेल, परंतु ते प्रयोग तार्किक बुद्धिमत्तेच्या आधारावरच करायला हवेत.

(लेखक संगणक अभियंता आहेत.)