अभ्यंगस्नान म्हणजे काय…जाणून घ्या दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे महत्त्व….

आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाला फार महत्त्व आहे. दिवाळीचा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. दिवाळी म्हणजे प्रत्येकाला फराळ, मिठाई आणि फटाके आठवतात. पण, यात एक गोष्ट अशी आहे…जी दिवाळीमध्ये आवर्जून केली जाते आणि ती म्हणजे अभ्यंगस्नान… दिवाळीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. पहाटे उठून अंगाला तेल व उठणे लावून आंघोळ केली जाते त्यालाच अभ्यंगस्नान, असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला खूप महत्त्व आहे. यालाच गंगा स्नान, थैला स्नान असेही म्हणतात. शारीरिक स्वच्छतेसह शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी अभ्यंगस्नान केले जाते. सामान्यत: दिवाळीला पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून सणाची सुरुवात केली जाते.

अभ्यंगस्नानाची सुरुवात सूर्योदय होण्यापूर्वी लवकरात लवकर उठून होते; जे पवित्र मनाने आणि भक्तिभावाने उत्सवाचे प्रतीकात्मक स्वागत केल्याचे दर्शवते. त्यासाठी तिळाचे तेल, चंदनाची उटी, लवंग किंवा हळद यांसारखे सुगंधी घटक असलेले उटणे वापरले जातात. अभ्यंगस्नानाने आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते. गरम केलेल्या तेलाने शरीरावर हळुवारपणे मालिश केली जाते. तेल आणि औषधी वनस्पतींचे शरीराला बरे करण्याचे गुणधर्म त्वचेमध्ये प्रवेश करतात. तेल लावल्यानंतर उटणे किंवा नैसर्गिक साबण वापरून कोमट पाण्याने स्नान केल्यावर अभ्यंगस्नान पूर्ण होते.

दिवाळीपासून थंडीला सुरुवात होते. थंडीच्या दिवसात वातावरणामुळे त्वजा शुष्क होते. कोरडी पडते. त्यामुळे खाज येणे किंवा रॅशेश येतात. तसेच काहीजणांच्या पायाला भेगा पडतात. तसेच ओठही फुटतात. त्यामुळे दिवाळीपासून अभ्यंगस्नान करून थंडीत शरीराला तेलाने मसाज करण्यात येतो. त्यामुळे अनेकजण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अभ्यंगस्नानाची प्रथा पाळत नसले तरी त्याला आयुर्वेदाचा आणि वातावरणाचा आधार असल्याचे दिसून येते.