पंजाबमध्ये पुन्हा एकदा रेल्वेचा निष्काळजीपणा दिसून आलाय. लुधियानामधील खन्ना स्थानकादरम्यान, रुळावरून धावणार्या अर्चना एक्स्प्रेसचे इंजिन बोगीपासून अचानक वेगळे झाले. ही बाब लोको पायलटच्या लक्षात आली नाही. यामुळे बोगींशिवाय हे इंजिन सुमारे तीन किलोमीटर धावत राहिले. ट्रकवर काम करणाऱया कर्मचाऱयांनी अलार्म वाजवत याची माहिती दिली. सुदैवाने या वेळेत या ट्रकवरुन दुसरी रेल्वे आली नाही. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या ट्रेनमध्ये दोन ते अडीच हजार प्रवासी होते. ही घटना सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी घडली. ट्रेन क्रमांक 12355/56 अर्चना एक्स्प्रेस पटनाहून जम्मूला जात होती. सरहिंद जंक्शन येथे या ट्रेनचे इंजिन बदलण्यात आले. यानंतर खन्ना येथे या एक्सप्रेसचे इंजिन बोगी पासून वेगळे झाले.
चौकशीचे आदेश
चालकाने तातडीने इंजिन थांबवून पुन्हा बोगींजवळ नेले. याबाबत रेल्वे अधिकाऱयांना माहिती देण्यात आली. ड्रायव्हरने इंजिन परत आणले आणि ते बोगींना जोडण्यात आले. या अपघातामुळे घबराट पसरली आहे. बॉक्स आणि इंजिनमधील क्लॅम्प तुटल्याने इंजिन वेगळे झाले. रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.