ट्रिपल इंजिन सरकारच्या काळात राज्याच्या प्रगतीचा वेग मंदावला; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

supriya-sule

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे नाव न घेता राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारवर टीका केली आहे. ट्रिपल इंजिन सरकार विकासासाठी सत्तेत आल्याचे म्हणत असले, तरी विकास सोडून राज्यात सर्वकाही सुरू आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात आहे. इथले उद्योग अन्य राज्यांत पळवले जात आहेत. प्रगतीचा वेगही मंदावत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

जाती-जातींत तेढ निर्माण होतेय. हे सारे केंद्र सरकारमधील अदृश्य शक्तीचे षडय़ंत्र असून, मराठी नेत्यांबरोबरच मराठी माणसाचाही घात होत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्रात दोनशे आमदारांचे सरकार स्थैर्य देऊ शकत नसून, राज्यात प्रचंड अस्वस्थता आहे. सध्याचे गृहमंत्री यापूर्वी यशस्वी राहिले असले, तरी त्यांचा सध्याचा कालावधी अपयशी ठरला आहे, अशा शब्दांत सुळे यांनी फडणवीसांवर टीका केली. अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांची भाजप आता राहिली नाही. आता ती भ्रष्ट जुमला पार्टी बनली आहे. इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडीच्या कारवाया केवळ महाराष्ट्रातच कशा होतात असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राच्या खच्चीकरणासाठी केंद्रातील अदृश्य शक्ती सतत कार्यरत असल्याचा आरोपही सुळे यांनी केला.

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांची वक्तव्ये समाजात दंगली घडवणारी वाटतात का, असे विचारले असता, हो तसेच दिसतेय, असे सांगत मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. परंतु, त्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्य़ावर राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून त्यात चर्चा करायला हवी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.