मणिपूरमधील संघर्ष सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले; सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

मे महिन्यापासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. तर हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मणिपूर हिंसाचारावरून संसदेत विरोधीपक्षांनी सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये महिलांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. हा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले, याचे स्पष्टीकरण संसदेत देण्याची गरज आहे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसभेत नियम 377अंतर्गत मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. देशभरात आरक्षण हा संघर्षाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका असो की मणिपूर येथील वांशिक हिंसाचार, यामागे आरक्षणाचाच मुद्दा आहे. मणिपूर येथील हिंसाचारात जून महिन्यात 142 जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे. जुलै संपत आला तरी येथील हिंसाचार थांबत नाही. जवळपास 54 हजार लोक विस्थापित झाले असून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मणिपूरमध्ये महिलांना दिवसाढवळ्या गोळ्या मारल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर मणिपूर येथील हिंसाचाराबाबत सरकारला तातडीने कारवाई करावी लागली. सरकारने हा व्हिडीओ जास्त पसरु नये, यासाठी प्रयत्न केले. तपास यंत्रणांना याप्रकरणी गुन्हे दाखल करुन आरोपींना गजाआड करण्यासाठी 77 दिवस लागले. हा संघर्ष सोडवण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले? याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

ज्या भागात वांशिक हिंसाचार उसळला आहे त्या भागातील महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तसेच तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. मणिपूरला निर्भय महिलांचा वारसा आहे, हे आपण विसरता कामा नये. त्यांच्याबरोबर उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. ‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’ हे विसरता कामा नये, असेही सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.