सामना अग्रलेख – घोटाळ्यावर शिक्का!

भारतात निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे सावट आहे. मेघालयातील बोलोंग संगमा या तरुणास नुकतीच अटक झाली. का? तर ‘ईव्हीएम’मध्ये सेटिंग करून प्रत्येक मत फक्त भाजपलाच कसे जाते याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून त्याने प्रसारित केला. ‘ईव्हीएम’द्वारे घेतलेल्या निवडणुकांत घोटाळाच घोटाळा असल्याचे त्याने सिद्ध करताच त्या भारतीय नागरिकास अटक केली. प्रश्न इतकाच आहे की, आता भाजपचेच खासदार डी. अरविंद कुमार यांनीही तेच सत्य सांगितले! त्यांचे हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर शिक्काच आहे! मग आता काय करणार? अरविंद कुमारना ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवा. त्यांनी सत्य, सत्य आणि सत्य सांगितले आहे.

‘सत्यमेव जयते’ हेच आपल्या देशाचे बोधवाक्य आहे. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हय़ाप्रमाणे उसळून वर येतेच. भाजपच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे. त्यात भर घातली आहे ती भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी. त्यांनी बेशकपणे, निर्भयपणे सांगितले की, ‘‘मतदारहो, तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार. आएगा तो मोदी ही…’’ याचा सरळ अर्थ असा की, भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे. ‘ईव्हीएम’ हॅक करून विजय संपादन करणे हेच भाजपचे सूत्र असल्याचे भाजपचे खासदार सांगत असतील तर भारताचा निवडणूक आयोग यावर काय पावले उचलणार आहे? खरे तर निवडणूक आयोगाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येणार नाहीत. कारण ‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगालाच ‘हॅक’ केले आहे. निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. भाजपच्या केंद्रीय सरकारचा तो हरकाम्या बनला आहे. निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेल’चे अधिकारी आणून त्यांच्याकडून हवी ती बरी-वाईट कामे करून घेतली जातात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाच्या हातात दिले, त्यामुळे या मनमानीवर शिक्कामोर्तब झाले. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एका समितीचे गठन केले. यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीशांचा समावेश होता. हा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा केराच्या टोपलीत टाकून सरकारने निवडणूक आयुक्त निवड समितीवरून सरन्यायाधीशांनाच हटवले. न्या. चंद्रचूड यांचा स्वाभिमानी बाणा निवडणूक आयोगाला परवडणारा नसावा व आयोगावर कळसूत्री बाहुली बसविण्यास न्या. चंद्रचूड यांनी विरोध केला असता. दुसरी गंमत अशी की, भारतीय जनता पक्षाचे आज

‘ईव्हीएम’वरचे प्रेम

उतू चालले आहे, पण ‘ईव्हीएम’ सुरक्षित नाही व मशीनमध्ये सेटिंग करून गोलमाल करता येतो हा पुराव्यासह शोध भाजपनेच लावला. भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर एक ग्रंथ लिहून ‘ईव्हीएम’विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजपचे मुलुंडकर नागडे पोपटलालही ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर तेव्हा आंदोलन करीत होते, पण 2014 साली सत्ता येताच या मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा व उत्सव सुरू केला. ‘ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा’ यावर मोहोर उठवून देशभरातील अंधभक्तांनी ‘ईव्हीएम चालिसा’चे पठण सुरू केले. जगातील अमेरिका, युरोप, जपान, जर्मनी, बांगलादेश, फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी तेथील निवडणूक प्रक्रियेतून ‘ईव्हीएम’ पद्धत मोडीत काढली. ‘ईव्हीएम’ विश्वासार्ह व समाधानकारक नाही हे सिद्ध झाल्यावरच हा निर्णय घेतला, पण विश्वासार्ह नसलेल्या ‘ईव्हीएम’ जनतेचा विश्वास गमावलेल्या मोदी सरकारने सुरूच ठेवल्या. हेच खरे गौडबंगाल आहे व हा भंगार माल का वापरला जातोय ते भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी आता स्पष्ट केले. आता भाजपचे ‘अंडा’ भक्त नेहमीचाच दावा करतील की, ईव्हीएमचा घोटाळा असेल तर अनेक राज्यांतील विधानसभांत भाजपचा पराभव होऊन विरोधकांची सत्ता का आली? तेथे ईव्हीएम हॅक का करण्यात आले नाहीत? हा साळसूदपणाचा प्रश्न म्हणजेच घोटाळा आहे. मोदी-शहांना राज्यातील सत्तेत इंटरेस्ट नाही, पण लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा ‘खेला’ करून दिल्लीची सत्ता ताब्यात घ्यायची व त्या सत्तेच्या बळावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टाचेखाली ठेवायचे. केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग, न्याय यंत्रणा यांच्या माध्यमातून राज्याराज्यांत धुमाकूळ घालायचा हे त्यांचे सूत्र आहे. ईव्हीएमचा घोटाळा फक्त लोकसभा जिंकण्यासाठी

असे एकंदरीत सूत्र

ठरलेले आहे व त्यानुसारच सगळे काही चालले आहे. निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात अशी मागणी देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सातत्याने करीत आहेत. ‘ईव्हीएम’मधून दिलेले मत नक्की कोणाला जाते हा संशय मतदारांच्या मनात असेल तर तो लोकशाहीचा पराभव आहे. निदानपक्षी बटन दाबल्यावर त्यातून आपण दिलेल्या मताचे चिन्ह बाहेर पडावे व समाधान झाल्यावर तो कागद पेटीत टाकावा, या मागणीवरही सरकार चालढकल करीत आहे. आपण ज्यास मत दिले ते त्या उमेदवारास गेले की नाही, या शंकेचे निरसन निवडणूक आयोग करू शकत नसेल तर या भाजपाई बोलक्या बाहुल्यांचा देशाला उपयोग नाही. निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजप कार्यालयातच हलवलेले बरे. भाजपचा एक खासदार ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाची कबुली देतोय, तरीही देशाचा निवडणूक आयोग थंडपणे हे सहन करीत आहे. आज टी.एन. शेषन असते तर त्यांनी ‘ईव्हीएम’च्या गोडाऊनवर बुलडोझरच फिरवला असता व लोकशाहीचे रक्षण केले असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे सावट आहे. मेघालयाच्या गारो हिल्स जिल्हय़ातील बोलोंग संगमा या तरुणास नुकतीच अटक झाली. का? तर ‘ईव्हीएम’मध्ये सेटिंग करून प्रत्येक मत फक्त भाजपलाच कसे जाते याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून त्याने प्रसारित केला. ‘ईव्हीएम’द्वारे घेतलेल्या निवडणुकांत घोटाळाच घोटाळा असल्याचे त्याने सिद्ध करताच त्या भारतीय नागरिकास अटक केली. प्रश्न इतकाच आहे की, आता भाजपचेच खासदार डी. अरविंद कुमार यांनीही तेच सत्य सांगितले! त्यांचे हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर शिक्काच आहे! मग आता काय करणार? अरविंद कुमारना ‘ईव्हीएम’ घोटाळय़ाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवा. त्यांनी सत्य, सत्य आणि सत्य सांगितले आहे.