पिसे बंधाऱ्याची पाणीपातळी खालावली; मुंबईत आज 15 टक्के पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया पिसे बंधाऱयाची पाणी पातळी खालावल्याने उद्या मंगळवार, 19 मार्च रोजी पाणीपुरवठय़ात 15 टक्के कपात करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, आवश्यक पाणीसाठा करून ठेवावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पिसे  येथील बांधावरील गेटच्या 32 पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये  शनिवार, 16 मार्च रोजी अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती सुरू झाली. सदर ब्लडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी 31 मीटरपर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला आहे. यानंतर पालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरुस्तीचे काम 18 मार्च रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  युद्धपातळीवर पूर्ण केले. भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले  आहे, मात्र बंधाऱयाची पाणी पातळी पूर्ववत होण्याकरिता कालावधी लागणार असल्याने 19 मार्च रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबईत 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

असा होतो पाणीपुरवठा

भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. पालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो.