शिवसेना नावाच्या आईच्या पोटावर वार करणारी ही औलाद, उद्धव ठाकरेंचे मिध्यांवर शरसंधान

ज्यांना शिवसेनेने मोठं केलं त्यांनी नुसता माझ्या पाठीत वार केला नाही, तर शिवसेना नावाच्या आईच्या कुशीवर वार केला. जिने जन्म दिला, मानसन्मान दिला त्याच आईच्या पोटावर वार करणारी ही औलाद आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे झालेल्या जनसंवाद सभेवेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

इंडिया आघाडीच्या सभेवरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काल आपण शिवतीर्थावर इंडिया आघाडीची जाहीर सभा घेतली, त्याची सुरुवात मी जमलेल्या माझ्या देशभक्त बांधव, भगिनी आणि मातांनो अशी केली. पण जे नमोसैनिक झालेत, मोदीभक्त झालेत, सत्तेच्या खुर्चीसाठी लाचार झालेत, दिल्लीश्वरांचे बूट चाटताहेत, त्यांच्यासमोर शेपूट हलवताहेत त्या मिंधेंच्या पोटात मुरडा आला. ते आज म्हणाले बघा यांची भाषा बदलली. मला नमोसैनिक आणि देशभक्तांना विचारायचं आहे, तुम्ही देशभक्त नाही का? हे सगळे मोदीभक्तीपायी इतके आंधळे झालेत की त्यांना फक्त मोदीभक्त इतकंच हवं आहे. पण आम्ही मोदी भक्त नाही, देशभक्त आहोत आणि देशभक्तच म्हणून राहू. तुम्हाला जी काही चाटूगिरी करायची असेल, त्याच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. पण आमच्या देशभक्तीच्या आड याल, तर तुम्हाला किती खोल गाडायचं ते आम्ही ठरवू., असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मिंध्यांच्या गद्दारीवरही त्यांनी यावेळी आसूड ओढले. ‘देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन पक्ष फोडून आलो, असं असेल तर त्यांच्या उपकारासाठी माझ्यावर टीका करताय तर करा. पण मिंधे आणि दोन्ही गद्दारांना मला विचारायचं आहे की असं नेमकं काय मी दिलं नव्हतं. कोण आणि काय होतात तुम्ही? एकाला आमदार केला, एकाला खासदार केला. इथे हळद प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी दिली. इथले ते भंगार यायचे, पोलिसांची धाड पडतेय वाचवा. मला वाटायचं शिवसैनिक आहेत, आंदोलनाची केस असेल आणि पोलिसांच्या लेखी कायदा मोडला म्हणून मी वाचवायचो. मला काय माहीत हा असा आकडेबाज निघेल. हे लोक असे आहेत, हे मला माहीत नव्हतं. कारण शिवसैनिक म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे पक्षप्रमुख म्हणून माझं काम होतं आणि आहे. पण, चांगल्या कामाच्या आडून जर गल्लीबोळातून बार उघडले तर काय.. आता यांना निवडणुकीत फक्त आपटीबार द्यायचा. या दोघांना उमेदवारी देण्याचं पाप मी केलं, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. यांनी नुसता पाठीत वार नाही केला. यांनी शिवसेना नावाच्या आईच्या कुशीवर वार केला. जन्मदातीने तुला जन्म दिला, मान सन्मान मिळवून दिला. नाहीतर तू कोण होतास, आज तुरुंगात सडत असतास. तुला शिवसेनेने मोठा केला. आणि हा उलटा फिरून आपल्याच आईच्या पोटावर वार करणारी ही औलाद आहे.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांवर टीकास्त्र सोडलं.

‘मुख्यमंत्री असताना मी यांना महाराष्ट्र लुटायला दिला नाही. अगदी आज जे पंतप्रधान आणि गृहमंत्री येताहेत. महाराष्ट्राची निवडणूक आजपर्यंत कधीच एवढी विभागली नव्हती. कारण मोदी येणार, अमित शहा येणार. मग तुमच्याकडे मतांची भीक मागणार. संकट काळात कधीतरी तुम्ही महाराष्ट्रात आलात का? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आलात का विचारायला? पण आता ते येतील. पोलिसांना आधी पाठवून सगळं साफसूफ करतील. हॉटेलमधलं जेवण भांड्यात ठेवून गरिबाच्या घरचा भाकर तुकडा खाल्ल्याचं दाखवतील. ही सगळी नाटकं करतील, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीवर बोलणाऱ्या गृहमंत्र्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा हे महाविकास आघाडीला पंक्चर झालेली रिक्षा म्हणाले होते. मी त्यांना उत्तर दिलं की, मग तुमचं ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं का लागताहेत. पूर्वी वाफेवर चालणारं इंजिन होतं, यांचं इंजिन थापेवर चालतं. भाडोत्री जनता पक्षाला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नाही. कारण, त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, मराठवाडा मुक्तिसंग्रामात किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कणभरही सहभाग नव्हता. कुठल्याच लढ्यात ते कधीच सहभागी झाले नव्हते. स्वातंत्र्यानंतर काही काळ तर ते आपल्या कार्यालयावर तिरंगासुद्धा फडकवायला तयार नव्हते. आता यांना देशप्रेमाचं भरतं आलं आहे. कारण, यांना देशाचं स्वातंत्र्य गिळायचं आहे. स्वातंत्र्य लढ्यात कधीही सहभागी नव्हते त्यांना स्वातंत्र्य गिळून आपल्याला गुलाम करायचं आहे, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी साधला.