इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवशी कुणीही ‘मातोश्री’ निवासस्थानी गर्दी करू नये, असे नम्र आवाहन उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना केले आहे.
उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै हा वाढदिवस शिवसैनिक दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रम राबवून साजरा करतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध भागांतून शिवसैनिक ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहचतात. यंदा मात्र इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असून वाढदिवसाला कुणीही ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
इर्शाळवाडीची दुर्घटना मन विषण्ण करणारी आहे. अशा दुःखद प्रसंगी आपण वाढदिवस साजरा करणार नाही; पण या दिवशी कोणी सामाजिक उपक्रम साजरे करणार असतील तर त्यांनी ते जरूर करावेत, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. योग्य पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन, असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीवासीयांना दिलेला आहे.