मिंधे-भाजपवाल्यांना सांगा ‘नो उल्लू बनाविंग’, आदित्य ठाकरे यांचं धारावीकरांना आवाहन

एकिकडे शिवसेना देशाचा विचार करतेय, तर दुसरीकडे भाजपवाले चारसौ पारच्या थापा मारताहेत. पण, आता मिंधे किंवा भाजपवाले दारात आले की त्यांना आता ‘नो उल्लू बनाविंग’ ही जाहिरात ऐकवा, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावीकरांना केलं. धारावी येथील शाखाभेटीवेळी ते बोलत होते.

भाजप आणि मिंधे गटाचा समाचार घेताना आदित्य यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या एका जाहिरातीचा चपखल उल्लेख केला. ते म्हणाले की, उष्णता वाढलीय पण निवडणूक अजून तापलेली नाही. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे तो विदर्भातून आपल्याकडे येईपर्यंत वातावरण आणि राजकीय तापमानही वाढत जाणार आहे. मुंबईत आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि अमोल किर्तीकर आहेत. ही चारही लोकं मुंबईकर दिल्लीत पाठवतील हा निर्णय ठामपणे आपण घेतलेला आहे. आज शाखा भेट आहे. या मतदारसंघाची सभा नाही. तरीदेखील आपण सगळे ऐकायला उभे आहात याचं कारण म्हणजे आपल्यासोबत उभा राहणारा एक माणूस आहे, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. याच व्यक्तिसाठी तुम्ही एकत्र आलेला आहात. एका बाजूला जेव्हा देशाचा विचार करतो. तेव्हा भाजपवाले येतात आणि थापा मारतात. सांगतात की चारसौ पार जाएंगे. एक जाहीरात होती, नो उल्लू बनाविंग.. ती डाऊनलोड करून ठेवा आणि मिंधे गट किंवा भाजपचं कुणी आलं, असं करू-तसं करू सांगायला लागलं की त्यांना हेच सांगायचं. नो उल्लू बनाविंग… कारण हे गाणं इतकं महत्त्वाचं आहे, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी धारावीवासीयांना केलं.

‘आज देशात हीच परिस्थिती आहे. लडाखमध्येही 30 ते 40 हजार लोक आंदोलन करताहेत. लडाखमध्ये 370 कलम काढलं आणि राज्य बनवायचं सांगून केंद्रशासित प्रदेश बनवला. त्यावेळी ज्या खासदाराने लडाख प्रगतिपथावर जाईल असं म्हटलं होतं आज ते खासदार दिसतही नाहीयेत आणि भाजपला वाटतंय की लडाखमध्ये त्यांचं डिपॉझिट जाईल. कारण एकच आहे, की तिथल्या लोकांचं कुणी ऐकत नाहीये. याचं कारण भाजपच्या हातात जी महाशक्ती आहे, ती दिल्लीवर संपूर्ण सत्ता काबीज करून बसली आहे. अशी सत्ता आपल्याला चालणार नाही. आज जर आपल्याला देश वाचवायचा असेल तर केंद्रात कुणाचंही सरकार आलं तरी ते मिलीजुली सरकार आलं पाहिजे. ते सरकार सगळ्यांचं असलं पाहिजे. लडाख, महाराष्ट्र, केरळ, मणिपूरमधून आलं पाहिजे, तरच आपले आवाज ऐकले जातील. आजचं जे सरकार आहे, ते एक माणसाचं सरकार आहे.

लडाख आणि धारावीची स्थिती काही वेगळी नाही. इथे धारावीचं पुनर्वसन होणार आहे. ज्या उद्योगपतीकडे हे काम हाती घेतलं आहे, त्याचं नाव काय? (गर्दीतून आवाज – अदानी) कुणाचा माणूस आहे? ( गर्दीतून आवाज – मोदी) विश्वास ठेवणार तुम्ही त्यांच्यावर (गर्दीतून आवाज – नाही). कारण हीच स्थिती होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आपण पण टेंडर काढलं होतं. ते कुणीही जिंकू शकलं असतं. पण आज जो विरोध होतोय तो याच कारणासाठी होतोय की कुणालाही अजून माहीत नाही की धारावीचं पुनर्वसन होत असताना किती लोकांना पात्र आणि अपात्र ठरवणार. मला असं कळलंय की इथे राहणाऱ्या 1 लाख लोकांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. असा विकास तुम्हाला मान्य आहे का? किती वर्षं तुम्ही इथे राहताय? म्हणजे आपण मूळ धारावीकर आहोत. आणि इथे आपल्याला घर मिळत असताना जे काही नियम आता लागू केलेले आहेत. त्याला आपला विरोध तर आहेच. पण आपली हीच भूमिका आहे की धारावीचा विकास होताना फक्त धारावीचाच विकास व्हावा, कुठल्याही उद्योगपतीचा, अदानीचा विकास होऊ नये, हीच आपली भूमिका आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

पियूष गोयल यांचाही यावेळी समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तर मुंबईचे उमेदवार पियूष गोयल हे केंद्रात दहा वर्षं मंत्री होते. पण, मुंबईचा एकतरी विषय त्यांनी दिल्लीत मांडला आहे का? कधी रेल्वे स्टेशन सुधारली? नावं बदलली पण परिस्थिती जशीच्या तशी ठेवलेली आहे. नाव बदलून काही होत नाही. काम बता के चलो. मुंबईसाठी काय काम केलं, या प्रश्नाचं उत्तर गोयल यांच्याकडे नाहीये. पण त्यांनी मांडलेली भयानक भूमिका धारावीकर म्हणून तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. त्यांचं स्वप्न झोपडपट्टीमुक्त करण्याचं आहे. ही आमचीही भूमिका आहे. पण, आमच्या भूमिकेत घर तिथेच मिळणार होतं. इथे पियूष गोयलांना मुक्त करण्याच्या नावाखाली इथल्या लोकांना वसई-विरारच्या मिठागरांमध्ये न्यायचं आहे. आपले धारावीकर इथेच चार पाच किमी परिघात नोकऱ्या करतात. पण वसई विरारवरून त्यांना इथे यायला जमणार आहे का? त्यामुळे धारावीकरांसाठीच आता आवाज उठवायचा आहे. त्यांचाच विकास इथे झाला पाहिजे. ट्रान्झिट कॅम्पही इथेच झाला पाहिजे. तुमची घरं तुमच्या डोळ्यांसमोर बांधली गेली पाहिजेत. मध्यंतरी धारावीकरांच्या सह्यांसाठी गुंड पाठवण्यात आले होते. जसं आज राजकारण्यांच्या घरी ईडी-आयटी-सीबीआय येतंय, उद्या केंद्रात यांचं सरकार बसलं तर धारावीकरांच्या सह्या घेण्यासाठी त्यांच्या घरी देखील ईडी-आयटी-सीबीआय पाठवतील, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.