भांडुपमध्ये इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याचा धोका

भांडुपच्या हनुमान नगरमधील नागेश्वर सोसायटीत अलीकडेच आधारभिंत कोसळून पंधरा घरांचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; पण या ठिकाणी आधारभिंतीचा भाग कोसळून इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रमेश कोरगावकर यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. भांडुप विधानसभा प्रभाग क्रमांक 116मधील समस्यांकडे रमेश कोरगावकर यांनी माहितीच्या मुद्दय़ाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. ही आधारभिंत कोसळून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी तातडीने आधारभिंत बांधण्याची गरज आहे. या बांधकामासाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.