दोन सामन्यांच्या तारखेत बदल; रामनवमी अन् निवडणुकीमुळे आयपीएलचा निर्णय

रामनवमी आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत थोडा बदल करावा लागला. 16 व 17 एप्रिलला अनुक्रमे अहमदाबाद व कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करून हा पेच सोडविण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 17 एप्रिलला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सामना होणार होता, मात्र आता हा सामना 16 एप्रिलला होणार आहे. याचबरोबर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 16 एप्रिलला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, तो आता 17 एप्रिलला होणार आहे.

कोलकाता पोलिसांच्या सांगण्यावरून बदल
कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधून आपली अडचण सांगितली. 17 एप्रिलला रामनवमी आहे, तर 19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे आम्ही 17 एप्रिलला ईडन गार्डन्स मैदानासाठी आवश्यक पोलीस सुरक्षा पुरवू शकत नाही, असे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने ‘बीसीसीआय’शी संपर्क साधत कोलकाता पोलिसांची अडचण सांगितली. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने कोलकाता आणि अहमदाबाद येथील सामन्यांच्या तारखांमध्ये एका दिवसाचा अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला, मात्र तारखेत बदल झालेल्या या दोन्ही सामन्यांसाठी विकल्या गेलेल्या तिकिटांबाबत अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाहीये.