कायदा हातात घेऊ नका, अजित पवार यांचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातले वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलक धडकणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषण आणि आंदोलन करणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना कायदा हातात घेऊ नका, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवण्यात येणार नाही, असा इशारा दिला आहे. या अजित पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुंबईत मोर्चा निघणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. ‘मराठा आरक्षणासाठी काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्याबाबत घोषणा करत आहेत. संविधानावर देश चालत आहे, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षी कुणीही श्रेष्ठ नाही, हे देखील लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना दिला.

या इशाऱ्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेवटी त्यांनी आता पोटातले ओठात आणलेच, पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केले आहे. दहा पाच जणांना जवळ करुन बाकी करोडो मराठ्यांचे वाटोळे केले, शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करुन दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिले आहे. अजित पवार अपघाताने सत्तेत आलेला माणूस आहे. तो जर असे बोलत असेल , तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच, तू कारवाई कर, केव्हा मराठे शांततेत उत्तर देतील, असे प्रतिआव्हान जरांगे पाटील यांनी दिले.