अमित शहांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे, भाजप आमदारांनी व्यक्त केली नाराजी

लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एका विधानामुळे मणिपूरमधील कुकी समाजाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्र्यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. मणिपूरमधील जातीय हिंसाचाराला म्यानमानहून आलेले शरणार्थी आणि घुसखोर जबाबदार असल्याचे शहा यांनी म्हटले होते.

मणिपूरमधील हिंसाचाराला म्यानमारमधून आलेले शरणार्थी आणि घुसखोर जबाबदार आहेत असे म्हणणाऱ्या अमित शहांकडे आमदारांनी पुराव्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ज्या 10 कुकी समाजाच्या आमदारांनी शहांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली त्यातील 7 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. यासह इंडियन ट्रायबल लीडर्स फोरमच्या (आयटीएलएफ) सदस्यांनीही गृहमंत्र्यांच्या विधानाची निंदा केली.

काय म्हणाले शहा?

अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शहा म्हणाले की, 2021मध्ये म्यानमारमध्ये सत्तांतर झाले. यानंतर येथे मिलिट्री शासन आले. तिथे एक कुकी डेमोक्रेटिक फ्रंट आहे. त्यांनी तिथे लोकशाहीसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सैन्याने त्यांच्यावर कारवाई सुरू केली. हिंदुस्थान आणि म्यानमारमध्ये बॉर्डर नसल्याने अनेक कुकी शरणार्थी बनून हिंदुस्थानात आले. हजारोंच्या संख्येने कुकी हिंदुस्थानात आले आणि जंगलामध्ये राहू लागले. यामुळे भौगोलीक असमतोल निर्माण झाला.

आयटीएलएफचा मैतेई समाजावर आरोप

दरम्यान, अमित शहांच्या विधानावर आयटीएलएफनेही नाराजी व्यक्त करत एक निवेदन जारी केले आहे. मणिपूरमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात कुकी समाजाच्या 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 44,425 आदिवासींना विस्थापित व्हावे लागले. मैतेई आणि आदिवासी समाज कुकींना त्रास देत असल्याचा आरोप आयटीएलएफने केला.