बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा 24 मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

महालक्ष्मी रेसकोर्स आवारातील 1200 मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हला बुधवारी (दिनांक 22 मे 2024) रात्री मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे निदर्शनास आले. बृहन्मुंबई महानगरपालिका जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कार्यरत राहून ही गळती थोपवून धरली आणि पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत केला आहे. त्यामुळे जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात गुरुवार, दिनांक 23 मे 2024 रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे विभागातील रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

या गळतीच्या दुरुस्तीचे काम आज गुरुवारी (दिनांक 23 मे 2024) रात्री 10 वाजता हाती घेण्यात येणार आहे. सदर काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल. परिणामी, उद्या शुक्रवार 24 मे रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाचा पहाटे 4.30 ते सकाळी 7.30 दरम्यानचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून दिनांक 22 मे रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे निदर्शनास आले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. सदर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम आज 23 मे रोजी रात्री युद्ध पातळीवर हाती घेण्यात येत आहे. त्यापूर्वी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात आज दिनांक 23 मे 2024 रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम आज गुरुवारी रात्री 10 वाजता हाती घेण्यात येणार आहे. पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. सदर काम शुक्रवारी दुपारपर्यंत पूर्ण होईल. परिणामी शुक्रवार, 24 मे रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ,डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाला पहाटे 4.30 ते सकाळी 7.30 या वेळेत नियमित दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.