राजदच्या कार्यालयात निवडणूक आयोगाची छापेमारी

बिहारच्या चार लोकसभा जागांवर पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे. बुधवारी या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्या दरम्यानच, बिहारच्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाने छापेमारी केली आहे.

औरंगाबाद येथे 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी औरंगाबाद येथील राजदच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. आयोगाच्या भरारी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे.

सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या छापेमारीनंतर कार्यालयातून 50 हजारांची रोख रक्कम आणि प्रचाराचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ही छापेमारी कुणाच्यातरी इशाऱ्याने केली जात असल्याचा आरोप राजदच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.