पक्षचोर शिंदे भाजपचे खेळणे, चावी दिली तेवढेच बोलतात

शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरणारे एकनाथ शिंदे हे भाजपच्या हातातील खेळणे आहेत. चावी दिली तेवढेच बोलतात. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर बोलू नये, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज लगावला.

काँग्रेसने दलित व मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते, त्याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. स्वातंत्र्यापासून 60-65 वर्षे देशात सर्व जातीधर्माचे लोक भयमुक्त वातावरणात राहात होते ते काँग्रेस सरकारमुळेच. भाजपच्या राज्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज जीव मुठीत घेऊन जगत आहेत याची शिंदे यांना जाणीव नाही, असे पटोले म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचे सरकारच असंवैधानिक आहे. शिंदे यांच्याकडे स्वतःचा पक्ष नाही, पक्षाचे चिन्ह नाही, ते सर्व शिवसेनेतून चोरून आणलेले आहे, अशी टीका पटोले यांनी केली. राहुल गांधी हे कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत हे शिंदे यांचे विधानही हास्यास्पद असून लोकशाही व्यवस्थेत कोण पंतप्रधान होणार, मुख्यमंत्री, मंत्री होणार हे जनतेच्या हातात आहे,  लोकसभा निवडणुकीनंतर स्वतःची काय अवस्था होईल त्याची चिंता शिंदेंनी करावी, असा टोला पटोले यांनी लगावला.