मोदी-शहा यांच्या खोटेपणामुळेच चीनची घुसखोरी वाढली, काँग्रेसची जोरदार टीका

हिंदुस्थानच्या एक इंच जमिनीवरही चीन अतिक्रमण करू शकत नाही, असे सांगत चीनने घुसखोरी केल्याचे नाकारणाऱया केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर आज काँग्रेसने जोरदार टीका केली. मोदी सरकारने असे वेळोवेळी चीनला निर्दोषत्व बहाल केल्यामुळेच चीनची आगळीक वाढली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर चीनची घुसखोरी निर्णायकपणे रोखली जाईल, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

सत्ताधारी पक्षाकडून चीनला प्रत्येक वेळी अशी क्लीन चिट दिली गेल्यामुळेच चीनचे फावले असून देशाला चीनच्या बेकायदा अतिक्रमणाचा सामना करणे अधिकाधिक कठीण होत आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

चीनसमोर मोदी, शहांची शरणागती
चीनने लडाखमधील 65 पैकी 26 गस्ती केंद्रे ताब्यात घेतली आहेत. अरुणाचल प्रदेशात 50-60 किमी आतमध्ये येऊन संपूर्ण गावे बांधली आहेत, अशी माहिती भाजप खासदार तापीर गाओ यांनीच लोकसभेत दिली होती. मोदी आणि शहा मात्र चीनला शरण जाऊन आपल्या सैनिकांचा आणि शहीदांचा अपमान करणारी भ्याड विधाने करत आहेत, असे टीकास्त्र रमेश यांनी सोडले आहे.