सामना अग्रलेख – यांचा खरा बाप कोण?

बाळासाहेब हे निष्ठावंतांचे ‘बाप’ आहेत व राहतील. मिंधे गटास एक तर बाप नसावा व असलाच तर तो गुजरात किंवा दिल्लीत असावा. कारण ज्या बेफाम पद्धतीने ते लोक महाराष्ट्रविरोधी कारस्थानांत सहभागी होत आहेत ते पाहता यांचा बाप शिवरायांच्या मातीत व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असूच शकत नाही. मोदी-शहा महामंडळाचे अंतिम ध्येय मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा नायनाट करणे व त्यासाठी शिवसेनेवर घाव घालणे हेच आहे. त्या कारस्थानात सध्याचा ‘मिंधे’ गट पूर्णपणे सहभागी असल्याने, असल्या महाराष्ट्रद्रोहय़ांना मराठी मनाचे मानबिंदू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. काही झाले तरी ‘बाळासाहेब’ त्यांना पावणार नाहीत!

मनी नाही भाव
म्हणे देवा मला पाव!
देव अशानं पावायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे!

असा एक अभंग तुकडोजी महाराजांनी रचला. तो आजही लोकप्रिय आहे. श्रद्धेची भावना नाही, पण लोकांना दाखविण्यासाठी देवापुढे मस्तक टेकायचे हे ढोंग आहे, असा त्या अभंगाचा भावार्थ. शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी गुरुवारी रात्री याच ढोंगाचे प्रदर्शन केले गेले व त्या ढोंगाचा प्रतिकार करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. शिवतीर्थावर जे घडले, ते दुर्दैवी असल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले. मराठी माणसांत फूट पाडून, संघर्ष घडवून दिल्लीचा सुल्तान मजा पाहत आहे, हे दुर्दैवच आहे. पण हा संघर्ष अटळही आहे. 17 नोव्हेंबर हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने शिवतीर्थावर जात, धर्म, राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन लोक स्मृतीस्थळी येतात. तेथे कुणी कुणाला अडविण्याचा प्रश्नच येत नाही, पण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱयांनी तेथे यावे व श्रद्धेचा बाजार मांडावा हे योग्य नाही. आज जो मिंधे गट सत्तेत आहे त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि इमानही विकले व पुन्हा ‘आम्हीच शिवसैनिक’ असे बोंबलत ते स्मृतीस्थळावर पोहोचले. हे ढोंग नाही तर काय? बाळासाहेबांनी ढोंगाचा व सोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. त्यामुळे अशा ढोंग्यांनी शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ अपवित्र करू नये ही जनभावना असेल तर ती चुकीची नाही. मिंधे गट स्वतःला ‘शिवसेना’ मानतो. हा गट उद्या स्वतःला अमेरिकेतील रिपब्लिकन, डेमोक्रॅट किंवा इंग्लंडमधील

हुजूर किंवा मजूर

पक्षही समजू शकतो. तो त्यांचा प्रश्न. चार आण्याची भांग प्यायले किंवा रुपयाचा गांजा चिलमीत भरून मारला की अशा कल्पना सुचतात. इथे तर खोकेच खोके असल्याने उच्च प्रतीचे नशापाणी करून कल्पना सुचत असतील. मुळात शिवसेना कोणाची? हा फैसला मोदी-शहांचा निवडणूक आयोग करणार नाही. हा फैसला जनतेच्या न्यायालयात होईल. पण जनतेच्या न्यायालयात जाण्याची हिंमत यांच्यात नाही. दुसरे असे की, शिवसेनेतील फुटीर गटाविरोधात लोकमत बिथरले आहे. त्यामुळे या गटातील काही खासदार व आमदारांनी असे जाहीर केले की, ‘‘गरज पडली तर आम्ही कमळ चिन्हावर लढू.’’ आता कमळ चिन्हावर लढू असे सांगणाऱयांची ‘शिवसेना’ कशी? व कमळाबाईच्या ओटीत शिरलेले ‘शिवसैनिक’ कसे? त्यामुळे ही ओटी शिवतीर्थावर पोहोचताच शिवसैनिकांनी त्यांना अडवले. सत्तेचा माज असलेल्या या लोकांनी स्मृतीस्थळावर गोंधळ घातला. त्यांना प्रकरण वाढवायचे होते व प्रत्यक्ष 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क परिसरात 144 कलम लावून बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची नाकाबंदी करायची होती. असा विचार करणारे लोक अघोरी प्रवृत्तीचे असतात व त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्याआधी मुंब्रा येथे शिवसेनेची एक जुनी शाखा कमळाबाईच्या मिंध्यांनी बुलडोझर लावून उद्ध्वस्त केली. तेथे उद्धव ठाकरे पोहोचले व त्यांच्या पाठोपाठ हजारो

शिवसैनिक रस्त्यावर

उतरले. मुंब्य्रातले हे चित्र कमळाबाईच्या मिंध्यांची झोप उडविणारे ठरले. त्याच निद्रिस्त अवस्थेत हे लोक शिवतीर्थावर पोहोचले व स्वतःची शोभा करून परतले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर कमळाबाई पुरस्कृत काही लोक, बाळासाहेब हे आमचेही ‘बाप’ असल्याचे तावातावाने बोलत होते. ते ऐकून लोकांचे हसून पोट दुखले. बाळासाहेब हे निष्ठावंतांचे ‘बाप’ आहेत व राहतील. मिंधे गटास एक तर बाप नसावा व असलाच तर तो गुजरात किंवा दिल्लीत असावा. कारण ज्या बेफाम पद्धतीने ते लोक वागत आहेत व महाराष्ट्रविरोधी कारस्थानांत सहभागी होत आहेत ते पाहता यांचा बाप शिवरायांच्या मातीत व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असूच शकत नाही. मोदी-शहा महामंडळाचे अंतिम ध्येय मुंबईचे महत्त्व नष्ट करणे, महाराष्ट्र कमजोर करणे, मराठी माणसाला कंगाल करणे, त्याच्या स्वाभिमानाचा नायनाट करणे व त्यासाठी शिवसेनेवर घाव घालणे हेच आहे. मराठी माणसांत भांडण-तंटे लावून मजा पाहायची हे त्यांचे सूत्र आहे. त्या कारस्थानात सध्याचा ‘मिंधे’ गट पूर्णपणे सहभागी असल्याने, असल्या महाराष्ट्रद्रोहय़ांना मराठी मनाचे मानबिंदू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते कमळाबाईच्या ओटीत जाऊन बसले आहेत. त्यांनी तेथेच बसावे. नाही तर प्रकरण आणखी पुढे जाईल! काही झाले तरी ‘बाळासाहेब’ त्यांना पावणार नाहीत!