लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष लोप पावतील! पृथ्वीराज चव्हाण यांचे भाकित शिंदे आणि अजित पवारांकडे रोख?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमने-सामने आहेत. तीन-तीन पक्ष दोन्ही बाजूला आहेत. या निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसे दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांनी दोन राजकीय पक्षांची नावे घेतली नसली तरी त्यांचा रोख शिंदे व अजित पवार यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांत उद्या (मंगळवार) मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांसाठी मतदान झाले असून 7 मे, 13 मे आणि 20 मे या तीन दिवशी अनुक्रमे तिसऱया, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 4 जून रोजी देशभरातील सर्व जागांची मतमोजणी होईल. मात्र त्यानंतर दोन पक्ष लोप पावतील, असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवल्याने तर्क – वितर्कांना उधाण आले आहे. हे दोन पक्ष कोण याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. दोन पक्ष नेमके कोणते? याबाबत त्यांनी भाष्य केले नसले, तरी त्यावरून अंदाज बांधले जात आहेत.

देशात मोदी विरोधी लाट
देशात जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. नेते काय सांगतात यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी नकोत ही एक सुप्त लाट आहे. त्यामुळे मोदींची तारांबळ उडाली आहे. धावपळ होत आहे. जर तुम्ही 400 पारचा नारा दिला आहे, तुमचे निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

भाजपचा जाहीरनामा सांगा
– तुमचे सरकार येणार हे निश्चित असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा. त्यांना पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय घेऊन ते बोलत आहेत.

– जी भाषा त्यांनी शरद पवार, राहुल गांधींबाबत वापरली, सत्तेत असलेली व्यक्ती आपल्या 10 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेत नाहीच. पण अपूर्ण आश्वासनं पूर्ण करणार का, यावरही काही बोलत नाहीत.

– फक्त काँग्रेस आली तर तुष्टीकरण होईल, तुमचं मंगळसूत्र घेऊन जातील, तुमच्या घरातली एक खोली घेऊन जातील अशी अनेक न पटणारी, लोक चक्रावून जातील अशी विधानं पंतप्रधान करत असल्याचे चव्हाण म्हणाले.