मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..! अंबादास दानवे यांचा मिंध्यांना टोला

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ रविवारी राजभवनात घेतली. एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार होईल या आशेवर राहिलेल्या मिंधे गटातील लोकांच्या आशांना सुरूंग लागला आहे. त्यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला टोला बजावला आहे. ” मिंधे गटातील उरलेल्यांनी मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर” असा टोला दानवे यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

”घ्या! जे निधी देत नाहीत म्हणून ओरड होत होती, आता तेच मांडीला मांडी लावून बसणार! आता कोणाला दोष देणार? मला कीव येते त्या ४० जणांच्या गॅंगची. अगोदरच मंत्री होण्याहून लाथाळ्या होत्या, आता तर मंत्रिपदाची स्वप्ने गाठोड्यात बांधा आणि टाका मंत्रालयाच्या माळ्यावर..! उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष हे आव्हान स्वीकारतील आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे पुनश्च घेऊन जातील. लढेंगे भी, जितेंगे भी! विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची भीती मिंधे गटापेक्षा भाजपलाच अधिक वाटते आहे. निकालाचा उलटफेर झाला तर सरकार वाचवण्यास केलेला हा खटाटोप आहे…”, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.