महाराष्ट्रातील तरुणांनी रोजगारासाठी गुजरातला जायचं का? आदित्य ठाकरे भाजपवर बरसले

बुलढाण्यात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी भाजपसह मिंधेंचा समाचार घेतला. ‘इंडिया’ आघाडी म्हणून जिथे-जिथे लढतोय, सगळीकडे वातावरण एकच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार फक्त राज्यातच नाही तर, देशातही येणार असे चित्र आता बदलत चालले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शेतकरी, तरुण आणि महिलांना यावेळी आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील सरकार बदलण्याचे आवाहन केले.

देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आपण पाहाल तर प्रत्येक राज्यात ज्या काही ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचार सभा सुरू आहे तिकडे तुफान गर्दी होत आहे. जनता आशीर्वाद देत आहे. 2014 ला आणि त्यानंतर 2019 ला आम्ही चूक केली होती. आता ती चूक पुन्हा करणार नाही. आम्हाला आता बदल हवा आहे, असे सगळीकडे वातावरण आहे. आम्हाला भाजप सरकार नकोय, असे जनता सांगत असल्याचे Aaditya Thackeray पुढे म्हणाले.

एकेकाळी आम्हीही भाजपसोबत सरकारमध्ये होतो. प्रचार करत होतो. आम्हीही स्वप्न घेऊन आपल्यात आलो होतो. देशात चांगलं काहीतरी घडू शकेल, असं आम्हाला वाटलं होतं. देशाला 65 वर्षे झाली, त्यावेळी या 65 वर्षांत काँग्रेसने काय केलं? असा प्रश्न भाजपने 10 वर्षांपूर्वी विचारला होता. आता भाजपचं 10 वर्षे बहुमताचं सरकार होतं. आता हे 10 वर्षे उलटल्यानंतर भाजप विचारत आहे, 75 वर्षांत काँग्रेसने काय केलं? मग ही 10 वर्षे होती कुणाच्या हातात?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आपण प्रचार करत होतो, त्यावेळी आपल्याला वाटत होतं, सामान्य नागरिकाचं सरकार येईल. शेतकऱ्याचं आणि महिलांचं सरकार येईल. तरुणांचं, वंचितांचं सरकार येईल. पण आज भयानक चित्र दिसत आहे. भीती वाटत आहे. कुठे ना कुठे तरी हा वाद किती चिघळणार? जी आंदोलनं आहेत ती पुढे काय रूप घेतील?, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

ड्रोन जेव्हा आपल्या डोक्यावरून फिरतो तेव्हा तुम्हाला भीती वाटली का? नाही. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीकडे निघाले होते. शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोग ही शेतकऱ्यांची मागणी होती. दोन काळे कायदे रद्द केले जातील आणि हटवले जातील, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. पण ते झालं नाही. ह्याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती ती एकही पूर्ण केली नाहीत. आणि नंतर दोन वर्षापूर्वी शेतकरी बांधव जेव्हा दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले, त्यावेळी सरकारने दिलेली वचनं पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. हे सांगण्यासाठी शेतकरी निघाले होते. शेतकरी काही अतिरेकी, गुंड नाहीत. पण याच शेतकऱ्यांवर लाठीमार केला गेला. त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले गेले. जे लडाखमध्ये चिनी सैन्याला रोखण्यासाठी झालं पाहिजे ते आपल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केलं गेलं. शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो. आता हे केंद्र सरकार शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणत आहे. माओवादी म्हणतात. अर्बन नक्षलवादी म्हणतात. लाठीचार्ज करतात. ड्रोनमधून शेतकऱ्यांवर अश्रूधुर सोडतात. हे आज आपल्या देशाचं दुर्दैवं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. अडीच वर्षे मिंधेंपासून सर्वांनी दाबायचा प्रयत्न केला. मात्र मीच त्यांना दाबून ठेवलं आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मिंधेंसह भाजपवर हल्लाबोल केला. केंद्रातलं जे भाजप सरकार आहे. हे तुमचं सरकार आहे, असं तुम्हाला वाटतंय का? 2014 मध्ये त्यावेळी जे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते, त्यांनी 5 एफ सांगितले होते. फार्म टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन, फॅशन टू फॉरेन, असं काय काय सांगितलं होतं. पण ड्रोनमधून तुमच्यावर अश्रूधुर सोडला असता तर काय वाटलं असतं? भीती वाटली असती ना? माझ्या देशातला शेतकरी अतिरेकी आहे का? नक्षलवादी आहे का? अर्बन नक्षलवादी आहे का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केले.

हीच भाजपा केंद्र सरकारमध्ये बसून आपल्याच शेतकऱ्यांवर लाठीमार करतेय, अश्रूधुर सोडते, गोळीबार करतेय, हीच भाजपा सत्ता काबीज करून आपल्या राज्यात सरकारमध्ये बसलेली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला आणि अतिवृष्टी झाली असेल. त्यावेळी भाजपा तुमच्या मदतीला आलीये का? हे राज्य सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे, गद्दारांचं आणि पक्ष चोरणाऱ्याचं सरकार आहे. कधी मदतीला आलंय? बांधावर कधी आलंय? तुमच्या बांधावर मोठ-मोठे होर्डिंग, कटआउट आणि बॅनर लागतील. पण ते कधी दिसणार नाहीत. कारण त्यांना महाराष्ट्र हा आपला कधी वाटतच नाही, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

263 कोटींच्या स्ट्रीट फर्निचर टेंडरविषयी मिहिर कोटेचा अधिवेशनात खोटं बोलले, आदित्य ठाकरेंकडून पोलखोल

महाराष्ट्राची प्रगती जेव्हा होते, शेतकरी बांधवांची प्रगती जेव्हा होते, चांगले सुवर्ण दिवस जेव्हा येतात, तेव्हा यांना पोटदुखी होते. कारण महाराष्ट्र प्रगती करेल तर आमचे इतर राज्य काय करणार? आमचं गुजरात काय करणार? आमचं केंद्र सरकार काय करणार? कारण हे कोणीही आपले लोक नाहीत. हे लक्षात घ्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शेतकरी आणि महाराष्ट्राच्या जनतेला केले.

2019 मध्ये ते 2022 मध्ये आपलं सरकार होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व मित्रपक्ष एकत्र होतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. उद्धव ठाकरेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती करण्यास आपण सांगितलं होतं. ते केलं की नाही केलं? ती कर्जमुक्ती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? उद्धवसाहेबांनी 2019 च्या निवडणुकीत जो शब्द दिला होता, कर्जमुक्ती करणार, तो मला अजूनही आठवतो. आपलं नागपूरला अधिवेशन झालं. ह्याच आपल्या नागपूरमध्ये उद्धवसाहेबांनी शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करण्याचा शब्द पूर्ण केला. ही कर्जमुक्ती करून दाखवली. शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर पोहोचवली. उद्धवसाहेब आणि आपल्या सर्वांची विचारधारा एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई! ते वचन आपण दिलं होतं ते पूर्ण केलं, याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली.

कोविड काळात अर्थचक्र बंद पडलं होतं. राज्यात उत्पन्नाचा कुठालाही स्रोत नव्हता. राज्याची तिजोरी भरायची कशी? असा एका बाजूला विचार सुरू होता. पण दुसऱ्या बाजूला कोविडशी लढत असताना आपल्या शेतकरी बांधवांना जेव्हा-जेव्हा अतिवृष्टी आणि गारपीट झाली तेव्हा त्या त्या वेळेला 2020 मध्येही साडेचौदा हजार कोटींची मदत आपण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवली होती. दोन आणि दहा रुपयांचे चेक दिले नाहीत. हे बोगस लोक देतात तसे. जी मदत ज्या पंचनाम्यामध्ये जशी असेल तशी उद्धवसाहेबांनी पाहिलं. शेतकरी बांधवांना आधार कसा देऊ शकू हे सर्वच मित्र पक्षांनी पाहिलं. याला बोलतात सत्ता, याला बोलतात राजकारण आणि याला बोलतात समाजकारण, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरेसाहेबांच्या राज्यात कर्जमाफी झाली. पण या राज्यात माझ्या नऊ एकर शेतीवर दीड लाखाचा बोजा चढवला आहे. मला कर्ज दिलं नाही. आता मी आत्मदहनाचा अर्ज दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे, अशी व्यथा एका शेतकरी महिलेने आदित्य ठाकरे यांच्यासभेत मांडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना धीर दिला. ताई घाबरू नका. महाविकास आघाडी तुमच्या सोबत आहे. ही जी तुमची भावना आहे, यासाठीच आपल्याला आपला उमेदवार दिल्लीला पाठवायचा आहे, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन वर्षांत तुमच्या एमआयडीसीमध्ये एक तरी नवा उद्योग आला आहे का? या महाराष्ट्रात एक तरी नवा रोजगार मिळाला आले का? मात्र महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली होती. जो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपण राज्यात आणणार होतो. पुण्याजवळ तळेगावला आणणार होतो, तो या सरकारने गुजरात पाठवला. एअर बस टाटाचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये येणार होता, तो पाठवला गुजरातला. मेडिकल डिव्हाई पार्क रोह्यात येणार होता, गेला कुठे, गुजरातला. बल्क ड्रग पार्क, आणणार होता, तो गेला कुठे गुजरातला. वर्ल्डकप फायनल गुजरातला झाली. वानखेडेत झाली असती तर जिंकलो असतो आपण. मग आज इकडच्या स्थानिक मुला मुलींनी गुजरातला जायचं? याचं उत्तर राजकीय आहे. आपल्याला केंद्र सरकार बदलायलाच लागेल आणि आपल्या हक्काचं सरकार केंद्रात आणायला लागेल, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.