राहुल गांधी यांनी हात जोडले, म्हणाले… अरे देवा, असा माणूस कसा रे पाठवलास!

‘माझा जन्म बायोलॉजिकल नाही, मला देवाने पाठवलेय’, असे विधान करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सडकून टीका केली आणि देवापुढे हातच जोडले. ‘आम्ही आता देवाला प्रश्न विचारतो. अरे देवा, असा माणूस कसा रे पाठवलास? पंतप्रधान आजकाल बरळत सुटलेत. असे कोणी सामान्य माणूस बोलला तर त्याला थेट वेडय़ाच्या डॉक्टरकडे नेले जाईल, असा जबरदस्त टोला राहुल यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना काही वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी स्वतŠच्या जन्माबाबत अजब भाष्य केले. त्यावर चौफेर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी मोदींचे स्वतŠला ‘ईश्वरी देण’ मानण्याचे विधान ऐकून देवाला हात जोडले. ते गुरुवारी एका प्रचारसभेत बोलत होते. हिंदुस्थानातील संपूर्ण जनता, इतर जीव बायोलॉजिकल आहेत. फक्त नरेंद्र मोदी बायोलॉजिकल नाहीत, त्यांना परमेश्वराने पाठवले आहे. म्हणूनच मी विचारतो की, परमात्म्याने असा माणूस कसा पाठवलाय? कोविड काळात हे म्हणायचे ‘थाळी वाजवा’, जेव्हा गंगा नदीत शव वाहत होते, यमुनेकाठी हजारो मृतदेह अंत्यसंस्काराविना पडले होते. रुग्णालयांत जागा शिल्लक नव्हती. ज्यांना परमात्म्याने पाठवलेय, ते अशा काळात मोबाईलची ‘फ्लॅश लाईट’ पेटवण्याच्या बाता करीत होते. युवकांनी रोजगार मागितला की हाच देवाचा अवतार गटारात पाईप टाकून त्याच्या गॅसवर भजे तळण्याचा सल्ला देतो, अशा सडेतोड शब्दांत राहुल गांधींनी मोदींच्या या नव्या ‘अवतारा’ची खिल्ली उडवली.

फक्त 22 लोकांसाठी काम

मोदींना देशातील समस्यांचे काहीएक सोयरसुतक नाही. ना बेरोजगार तरुणांची चिंता, ना शेतकऱयांचा कळवळा. देवाने पाठविलेला हा माणूस फक्त 22 लोकांसाठी काम करतोय. अदानी, अंबानींना जे हवे, ते काम 24 तासांत करण्याचा चमत्कार केला जातो. पण शेतकरी कर्जमाफी मागतो, तेव्हा मोदी फक्त पाहत राहतात. शेतकऱयांना देण्यासाठी त्यांच्याकडे काही नसते, अशीही टीका राहुल यांनी केली.

हे बाबा बरळतात अन् चमचे ‘वाह वाह’ म्हणतात!

राहुल गांधी यांनी मोदींचे अंधभक्त आणि गोदी मीडियाचाही चांगलाच समाचार घेतला. ‘तुम्ही का थकत नाही?’ असा प्रश्न मुलाखतीत विचारला असता ‘मी थकत नाही कारण माझा जन्म बायोलॉजिकल नाही’ असे मोदी म्हणाले. त्यांचा संदर्भ देत राहुल म्हणाले, मोदी वाट्टेल ते बोलत सुटलेत. मोदींचा हा दावा अजब आहे. रस्त्यावर जर कुण्या सामान्य माणसाने असे म्हटले तर आपण त्याला ‘माफ कर बाबा, पुढे जा’ असे म्हणू. पण मोदींची मुलाखत घेणारे चमचे अजब दावे ऐकून घेतात. किंबहुना, मोदी बाबा बरळतात, अन् त्यावर चमचे ‘वाह वाह’ करतात, असा टोला राहुल यांनी लगावला.

शु।़।़।़ कुणी हसू नका! वाचा मोदी काय म्हणाले!

आई हयात होती तेव्हा मला वाटायचं बायोलॉजिकली माझा जन्म झाला आहे. पण आई गेल्यानंतर मी सगळे अनुभव एकत्र करून पाहिले तेव्हा कळून चुकले की मला परमात्म्यानेच पाठविले आहे. ही ऊर्जा बायोलॉजिकल शरीराने येऊ शकत नाही. ईश्वराला माझ्याकडून काहीतरी काम करून घ्यायचे आहे म्हणून ही ऊर्जा मला दिली आहे. देवाने मला प्रामाणिकपणा दिला, पुरुषार्थ करण्याचे सामर्थ्य दिले आणि प्रेरणाही तोच देत आहे. मी कुणीच नाही. केवळ एक इन्स्टमेंट आहे. म्हणूनच मी जे काही करतो ते देवच माझ्याकडून करून घेत आहे.