भाजपच्या गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी; ‘चले तो चांद तक, नही तो शाम तक’! – जयंत पाटील

भाजपची गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी आहे, “चले तो चांद तक, नही तो शाम तक” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दाखल झाली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वात अस्वस्थ शेतकरी आहे. यापूर्वी देखील देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला होता. 700 पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण मोदी सरकार जागचे हलले नाही. आता पुन्हा एकदा शेतकरी बांधव शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून लढतो आहे. इतर कसली नको आधारभूत किंमत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या, असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, कांद्याचे भाव पडले आहेत. निर्यात बंदी उठवण्याची दानत या सरकारची नाही. केळी, संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करता येत नाही. द्राक्षाचीही काही वेगळी अवस्था नाही. सोयाबीनचे दर पडलेले आहेत. सत्तेवर येण्याआधी जे कापसाला 10 हजार रुपये मागत होते, सोयाबीनला 6 हजार रुपये मागत होते ती लोकं आता काहीच बोलायला तयार नाही. देशभरातील शेतकऱ्यांनी आता संघटित व्हायला पाहिजे.

कश्मीरच्या सीमेवर ‘जवान’, तर देशात ‘किसान’ मरतोय; हीच मोदींची गॅरंटी, संजय राऊत कडाडले

राहुल गांधी यांनी भारतभर पदयात्रा काढली आणि आता न्याय यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र टिव्हीवर, मोबाईलवर ते कुठेच दिसणार नाही. कारण तुमच्या पर्यंत काय पोहचवायचं याचा निकाल झालेला आहे. जे सोयीचे आहे तेच तुमच्या डोळ्यांना दिसते. त्यामुळे सत्य पुढे येतच नाही. घराघरात बेकारी, महागाई आहे, शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी जागरूक झाले पाहिजे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भविष्यकाळात तुम्ही लढाल असा विश्वास बाळगतो, असेही जयंत पाटील म्हणाले.