सरकार केवळ अदानींसारख्या अब्जाधीशांसाठी चालवणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून आता निवडणूक निसटत चालली आहे. ते पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे पुढच्या चार-पाच दिवसांत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मोदी काही ना काही ड्रामा करतील. तेव्हा तुमचे लक्ष ढळू देऊ नका, अशी साद काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज देशातील जनतेला घातली.
अदानी-अंबानींकडून काँग्रेसला टेम्पो भरून काळा पैसा मिळाला का, असा प्रश्न विचारून आरोपांचे हवेत तीर मारणाऱया नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांनी आज पुन्हा एका व्हिडीओ संदेशाद्वारे समाचार घेतला. पराभव दिसत असल्याने मोदी आता ड्रामेबाजी करतील, पण तुम्ही आता ठाम राहा. मोदींनी आपल्या सत्ताकाळात कशी खोटी आश्वासने देऊन फसवले हे लक्षात ठेवा, असे सांगत राहुल गांधी यांनी तोफ डागली. मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देणार असे खोटे सांगितले. चुकीचा जीएसटी लागू केला. सत्ता चालवताना सगळं काम अदानींसारख्या लोकांसाठी केलं, याकडे लक्ष वेधत राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीचे सरकार येणारच असा विश्वास व्यक्त केला.
30 लाख सरकारी नोकऱयांची गॅरंटी
4 जूनला देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनत आहे. आमचे सरकार लगेचच ‘भरती भरोसा योजना’ आणणार आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत आम्ही 30 लाख रिक्त सरकारी पदांसाठी भरती सुरू करणार आहोत. देशातील तरुण बेरोजगारांना ही आमची गॅरंटी आहे, असे राहुल यांनी सांगितले.