जनतेच्या घामाचा पैसा ‘मित्रों’च्या खिशात घालणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला – नाना पटोले

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागील 9 वर्षात जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ मुठभर उद्योगपती मित्रांसाठीच काम केले आहे. सातत्याने खोटं बोलणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला हे देशाचे दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा मित्रोंच्या खिशात घालण्याचे एकमेव काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

जनसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नाना पटोले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून केली. यावेळी वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाली होती.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण मिळवण्यात आले होते, गरिबीचे प्रमाण कमी करण्यात यश आले होते. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकाराने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले पण मागील 9 वर्षापासून केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारीत वाढ झाली, शेती व शेतकऱ्याला संपवण्याचे काम सुरु आहे. संविधानिक संस्था संपवण्याचे काम केले जात आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड नाराजी असून भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची भावना जनतेमध्ये दिसून येत आहे.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेल्या नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. भुईकोट किल्ल्यातील पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्यासह क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहराध्यक्ष किरण काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, अशोक कानडे, मनोज गुंडेचा, उत्कर्ष रुपवते, नलिनी गायकवाड, संजय झिंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व लोक सहभागी झाले होते. उत्तर महाराष्ट्रातील साडेतीन हजार गावे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जाणार आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब खोरात यावेळी म्हणाले की, आपल्याला देश वाचवायचा आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे आणि काँग्रेस व भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते. काँग्रेस विचार आणि हिंदुस्थानी संस्कृतीच देशाला वाचवू शकते. आपल्यात भेदभावाला थारा नाही हा विचार हिंदुस्थानी संस्कृतीने आपल्याला दिला आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे, जनसंवाद यात्रा ही प्रेमाचा विचार घेऊन जनमानसात जाणार आहे आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे. भाजप सरकारवर तोफ डागत थोरात म्हणाले की, मराठा समाज या सरकारकडे आशेने पहात होते पण सरकार काहीच हालचाल करत नसल्याने त्यांची निराशा झाली व आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. मविआ सरकार असताना अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती, या समितीने सातत्याने मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला पण मागील दिड वर्षात शिंदे सरकारने मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा प्रभाव देशभर जाणवू लागल्याने जालन्यातील घटना घडवली काय अशी शंका येते. वन नेशन, वन इलेक्शन व्यवहार्य आहे का हेसुद्धा तपासण्याची गरज आहे, असे थोरात म्हणाले.

विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखालील आज इंचनाळ ता. गडहिंग्लज येथून जनसंवाद यात्रेला सुरूवात होऊन भडगाव येथील सभेने सकाळच्या सत्राची सांगता झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील पदयात्रेत आजही हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. माता भगिणींनी ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करून नेत्यांचे औक्षण केले. कोल्हापूर जिल्ह्यात लोकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यात्रेचे स्वागत केले. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रा काढली. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी नागपूर दक्षिण मतदारसंघात जनसंवाद पदयात्रेत सहभाग घेतला.