पाण्याअभावी डाळिंब बागा जळाल्या; शेतकरी हवालदिल, माण तालुक्यात भीषण पाणीटंचाई

माण तालुक्यातील मार्डी, मोही, पळशी माळीखोरा आदी परिसरात दरवर्षी डाळिंबाचे भरगच्च उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांनी शेकडो एकरांवर मोठय़ा प्रमाणात डाळिंबाची लागवड केली आहे. पण सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून, पाण्याअभावी डाळिंब बागा जळू लागल्या असून, या बागा जगविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे.

यावर्षी दमदार पाऊसच झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरातील ओढे, नाले, तलाव कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागत आहे. पाऊस नसल्याने खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला. शेतातून कोणतेच पीक हाती लागले नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, मोठय़ा कष्टाने लागवड केलेल्या डाळिंब बागेसाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मार्डी, पळशी परिसरात शेकडो एकरावर डाळिंबाच्या बागा आहेत. पण पाणी नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या डाळिंब बागा पाण्याअभावी जळून जात असल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे.

पारंपरिक पिकांना बगल देत आता अनेक शेतकरी फलोत्पादनाकडे वळले असल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने अनेक शेतकरी डाळिंब उत्पादनाला पसंती देत आहेत; पण यावर्षी परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरात अनेक शेतकरी आर्थिक ओढाताण सहन करत हात उसने पैसे घेऊन विकतचे पाणी विहिरीत सोडून ठिबक सिंचनाद्वारे डाळिंब बागांना देत आहेत.

एका टँकरसाठी एक हजार रुपये
सध्या पाच हजार लिटरच्या लहान टँकरसाठी एक हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत असून, या पाण्यावर कशीतरी पाचशे झाडे जगवता येत आहेत. सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असून, पाणी कमी पडत असल्याने पाच ते सहा दिवसांनी पुन्हा पाणी द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. डाळिंब जगवण्यासाठी पाणी विकत घेताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने बागा जगवणे अवघड झाले आहे.

आता बँकांची कर्जे फेडायची कशी?
दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून, परिसरातील तरुण नोकरीच्या मागे न लागता डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, सध्या पाणी नसल्याने बागा जळू लागल्या असून, आता बँकांची कर्जे फेडायची कशी, अशी चिंता तरुणांना भेडसावत आहे.

सध्या भीषण पाणीटंचाई भासत असून, विकत पाणी घेऊन बागा जगवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बागा जगविण्यासाठी शासनाने मदत करावी.
– शिवाजी पोळ, शेतकरी, मार्डी