EVM बंद पडण्यामागे मोदीकृत षडयंत्र, भाजपचा जाहीरनामा हा फेकनामा; संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू झालं आहे. महाराष्ट्रातील 8 जागांवर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या मुद्द्यावरून आणि भाजपने शिवसेनेच्या वचननाम्यावर केलेल्या टिकेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. ईव्हीएम मागे मोदीकृत षडयंत्र आहे. तसेच भाजपचा जाहीरनामा हा फेकनामा असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला.

‘शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील 8 जागांपैकी तीन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, बाळासाहेबांची मूळ शिवसेना आणि चोरलेली शिवसेना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत’, असा ठाम विश्वास व्यक्त करत Sanjay Raut यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

महाराष्ट्र आणि देशाचे हित हेच शिवसेनेचे वचन

‘मतदान होत असलेल्या आठ जागांवर भाजपला आणि त्यांच्या नव्या सहकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर फार मोठा संघर्ष करावा लागतोय. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या 5 जागा, या 8 जागा आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवारच जिंकतील, असे वातावरण आहे. आम्ही 35 प्लस जागा जिंकू, हा टार्गेट आकडा आहे. एवढ्या जागा जिंकतोय. या आठही जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जिंकत आहे’, असे संजय राऊत म्हणाले.

‘हा एक षडयंत्राचा भाग’

वर्धा, अमरावतीत काही ठिकाणी सकाळच्या सुमारास ईव्हीएम बंद पडले होते. त्यावर संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला. ‘हे वारंवार होतंय आणि केलं जाईल. अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकते. वर्ध्यामध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उद्धव ठाकरे तिकडे आणि अमरावतीत जाऊन आले. ईव्हीएम मशिन बंद पडणं आणि मतदारांचा खोळंबा करणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशिन सुरू होतात आणि अचानक मग ज्यांना हवेत त्यांच्या झुंडी उभ्या राहतात. जो मतदार मतदानासाठी सकाळीच येतो त्याला ना उमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतील मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा; मोदी सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग परत आणणार

‘मोदींचे दहा वर्षांत वारंवार युटर्न’

‘लोक ठरवतील. त्यात युटर्ननामा असं काय आहे? हे स्पष्ट करावं. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना अशा अनेक भूमिका आम्ही वचननाम्यात घेतल्या आहेत, त्याला विरोध आहे का? किंबहुना नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत वारंवार जे युटर्न घेतलेले आहेत, त्यांचा जाहीरनामा म्हणजे फेकनामा आहे. आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तीन पक्ष एकत्र आल्यावर आम्ही आमची भूमिका जाहीर केली. पण यांना पोटदुखी आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने जे काही चांगलं होत आहे ते यांना सहन होत नाही’, असा भीमटोला संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींना लगावला.